Download App

‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य, जाती-जातीत भांडण लावू नका’; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या…

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतं मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. याबाबतचा जीआरही काल सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत कुणबी समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता तेली समाजही आक्रमक झाला आहे. दरम्यान, या सर्व बाबींवर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाष्य केलं आहे.

आज परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने त्या तुळजापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं अशी कोणतीच मागणी नव्हती. त्यांची साधी मागणी होती की, त्यांना मराठा आरक्षण मिळावं. आमचं मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला समर्थन आहे, पण असं कोण म्हणलं की, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या? असा सवाल त्यांनी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं, हे असं शक्य नसतं. संविधानाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्दावरून जाती-धर्मामध्ये भांडण लावून कोणी त्याचा फायदा घेऊ नये, मराठा समाजाला खरं खरं आरक्षण दिलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मोदी सरकार डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जाणार; अमोल कोल्हेंचा दावा 

शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त पंकजा मुंडे धाराशिव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी उमरगा तालुक्यात सभा घेतली. तसेच तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन घेतले. त्या म्हणाल्या, तुळजाभवानीची कृपा आमच्यावर आहे. मुंडे साहेबांनी प्रत्येक दौऱ्याची सुरुवात तुळजापूरपासून केली होती. त्यामुळेच तुळजाभवानीचा आशीर्वाद आम्हाला पहिल्यापासून आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. आज त्याची आई आणि गावातील लोक त्यांना आंदोलनास्थळी आले होते. यावेळी ते म्हणाले की, आतापर्यंत आरक्षणासाठी जे बळी गेले, तसं आता होणार नाही. रक्ताचा थेंब आटेपर्यंत मराठा समाजासाठी लढेल आणि आरक्षण मिळवून देईल, असं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us