Beed News : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला पोलिसांकडून तुझं कॅरेक्टर खराब करुन टाकण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोयं. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या ट्विटर हॅंडलवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून बीडमध्ये घडलेल्या प्रकाराची निरपेक्षपणे चौकशी करण्याची मागणीही करण्यात आलीयं. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.
शेतकऱ्यांच्या पोरांचं कॅरेक्टर खराब करायचं काम पोलिसांनी केव्हापासून हाती घेतलं आहे?? @Dev_Fadnavis साहेब.. आम्ही पोलिस डिपार्टमेंटची मनापासून इज्जत करतो आहोत अन् करतही राहू.. मात्र जिथं न्यायाची अपेक्षा ठेवायची तिथं भाषा असभ्य असेल तर यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी?? आपणास… pic.twitter.com/U6eZBu96M8
— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) October 10, 2025
मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या कानडी घाटमध्ये शेतजमीनीच्या वाद सुरु असतानाच पोलिसांनी शेतकऱ्याच्या मुलाला धमकी दिलीयं. व्हिडिओमध्ये पोलिस आणि शेतकरी मुलाचा संवाद दिसून येत असून पोलिस स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाला तुझं कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देत असल्याचं पाहायला मिळतंय.
एखाद्या विद्यार्थ्याला ऑन कॅमेरा अशी धमकी देणे हे कितपत योग्य आहे, आपण शहानिशा कायदेशीर चौकटी राहुन केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. हे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले असून आपण यामध्ये निरपेक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आलीयं.
शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, “शेतकऱ्यांच्या पोरांचं कॅरेक्टर खराब करायचं काम पोलिसांनी केव्हापासून हाती घेतलं आहे?? @Dev_Fadnavis
साहेब.. आम्ही पोलिस डिपार्टमेंटची मनापासून इज्जत करतो आहोत अन् करतही राहू.. मात्र जिथं न्यायाची अपेक्षा ठेवायची तिथं भाषा असभ्य असेल तर यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी?? आपणास विनंती आहे की आपण मौजे कानडी घाट जिल्हा बीड येथे घडलेल्या प्रकरणात निरपेक्ष चौकशी करावी.. एखाद्या विद्यार्थ्याला तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय म्हणून कॅरेक्टर खराब करण्याची धमकी ऑन कॅमेरा देणे कितपत योग्य आहे याची शहानिशा आपण कायदेशीर चौकटीत करावी.. व्हिडिओ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची काय चूक आहे हे पण समोर आणावं..
मात्र जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातून शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये संताप निर्माण होत असून आपण यात तत्काळ लक्ष घालणं आवश्यक आहे.. या बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे.. पोलीसच सामान्य शेतकऱ्यांना अन् त्यांच्या पोरांना धमकी देणारे असतील तर भविष्य वाईट दिशेने घेऊन जाणारे ठरेल…”