महाराष्ट्रातील नागरिकांनी पुढील 5 दिवस (Weather) दुपारी 12 नंतर गरज असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देताना हे आवाहन केलं आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 – 45 अंशांवर पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अकोला जिल्ह्याचा पारा आज 43 अंशांवर तर पुढील दोन दिवसात 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये पारा 42 अंशावर असून पुढील दोन दिवसात 45 अंशांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भासह मध्यमहाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांपार असणार आहे.
नागरिकांनी पुढील 5 दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 42 – 45 अंशावर जाण्याची शक्यता असून दोन दिवसांनंतर विदर्भातील जिल्ह्यांना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे वेधशाळा विभाग प्रमुख एस. डी. सानप यांनी दिली.
विदर्भात अनेक ठिकाणी 40 अंशांहून अधिक अंशांवर आहे. परभणीमध्ये, मालेगावमध्ये 41 अंश इतकं तापमान आहे. कोकणामध्ये 35 ते 36 अंशांपर्यंतच तापमान नोंदवण्यात आलं आहे. सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त आहे. हे तापमान 40 अंशांच्या वर असलं तरी उष्ण लहरी म्हणजेच हिट वेव्ह घोषित करण्यासाठी जे निकषांमध्ये तापमान 40 अंशांहून अधिक हवं ही पहिली अट आहे.
त्याचबरोबर दुसरी अट ही हे वाढीव तापमान सरासरी तापमानापेक्षा 5 अंश अधिक हवं. सध्याचं तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी जास्त आहे. म्हणून उष्णतेच्या लाटेची घोषणा केलेली नाही. मात्र पुढील काही दिवसांमध्ये या दोन्ही अटी पूर्ण करणारी काही ठिकाणं असतील असं आता दिसत असल्याने त्यावेळी तेव्हा तिथे उष्णतेच्या लाटेची घोषणा केली जाईल.
तापमान का वाढलं?
स्पष्ट आकाश आणि आर्द्रतेचा अभाव असल्याने आणि ढग नसल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडतो. पाण्याची वाफ कमी असल्याने हवा लवकर गरम होते आणि उष्णता वाढते, हे वाढत्या तपामनामागील एक प्रमुख कारण आहे. या शिवाय पश्चिमी हवामान प्रणाली म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स यंदा कमकुवत असल्याने थंड हवा आणि पाऊस पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळेच गरम हवा अडकून पडली आहे असं म्हणता येईल.
वातावरणात उच्च दाबामुळे गरम हवा खाली अडकून राहते. त्यामुळे हिट डोमसारखी स्थिती तयार होत असल्यानेच तापमान वाढते. एप्रिलमध्ये नैसर्गिकरित्या उन्हाळा तीव्रच असतो. मात्र यंदा हिवाळ्यातील कमी पाऊस आणि जागतिक तापमान वाढीमुळे तापमानावर परिणाम झाला आहे.
सर्वाधिक तापमान कुठे?
अकोला 43 अंश (2.4 अंश अधिक) पुढील काही दिवसांमध्ये तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
