राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची (Temperature) लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे पोहोचला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर उन्हाने कहर केला आहे. पुढील काही दिवस राज्यात असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात अजून आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडणार?
नागपुरात तापमानाचा पारा 45. 5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमानात वाढ झाल्याने उकडा देखील वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहान हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मंगळवारी विदर्भातील 3 जिल्ह्याचं तापमान हे 46 अंश सेल्सिअस इतक होतं, तर तीन जिल्हयाचं तापमान 45 अंश सेल्सिअस इतंक होतं. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान वर्धा जिल्ह्यात देखील उष्णता चांगलीच वाढली आहे. वर्ध्यात सलग दोन दिवस ४६.५ अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जाण्याची शक्यता असून, आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे हॉट अँड ह्युमिड वातावरणाचा सामना मुंबईकरांना करावा लागेल.
सकाळपासूनच मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात उकाडा जाणवत असून, दुपारच्या वेळेत उष्म्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागात दमट वारे वाहत असल्याने नागरिकांना अधिक घाम आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे.
हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
