Download App

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

News Arena India Survey Maharashtra :

राज्यात निवडणुका जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विविध निवडणूक नियोजन संस्था आणि माध्यमं त्यांचे सर्व्हे घेत असून त्याचे आकडेवारी जाहीर होऊ लागली आहे. असेच एक सर्वेक्षण ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने केला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (News Arena India maharashtra assembly election survey 2024 BJP will be the largest party with 123-129 seats )

या सर्व्हेनुसार, पक्षनिहाय वर्तविण्यात आलेल्या अंदाजामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 123-129 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा मिळणार असल्याचं म्हंटलं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला 55 – 56 जागा आणि काँग्रेसला 50-53 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 17-19 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे. तर इतर 12 जागांवर छोटे पक्ष आणि तेलंगणाच्या बीआरएस पक्षाही महाराष्ट्रात एन्ट्री मिळविणार असल्याचे भाकीत या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे.

काय सांगितले आहे या सर्व्हेमध्ये?

➡️ एकनाथ शिंदे यांची शिवसेना येत्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल.

➡️ भाजपा + इतर + अपक्ष 140 च्या घरात राहण्याचा अंदाज असून मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहण्याची शक्यता आहे.

➡️ मुस्लीम समाज महाविकास आघाडीकडे वळल्याने MIM ला 0 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

➡️ राष्ट्रवादी आणि काँघ्रेस या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होईल. पण बहुमताच्या जवळ जाता येणार नाही.

➡️ याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कोकण वगळता महाराष्ट्राच्या इतर भागातील प्रभाव आटाला आहे.

➡️ मजबूत स्थानिक उमेदवारांमुळे भाजपने जवळपास 35% जागा जिंकल्या आहेत.

➡️ काँग्रेसला महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा होत आहे. महाविकास आघाडीशिवाय काँग्रेसला 28 जागाही जिंकता येणार नाहीत.

➡️ मुख्यमंत्री पसंती- देवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%), OTH (9%).

➡️ काँग्रेस केवळ त्यांच्या मजबूत उमेदवारांमुळेच जागा जिंकत आहे. जर त्यांनी पक्ष बदलला तर त्यांची संख्या कमी होईल.

झी आणि सकाळच्या सर्वेक्षणात होते पिछाडीवर :

दरम्यान, यापूर्वी जाहीर झालेल्या झी आणि सकाळ या माध्यम समुहांच्या सर्वेक्षणामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते. सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा महाविकास आघाडी अग्रेसर होईल असे सांगण्यात आले होते. मविआत काँग्रेसला 19.9 टक्के, राष्ट्रवादीला 15.3 टक्के, उद्धव ठाकरे गटाला 12.05 टक्के म्हणजेच एकूण 47.07 टक्के लोकांनी पसंती दिर्शवली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या टक्केवारीची बेरीज केली तर ती 39.3 येवढी दिसून आली होती.

झी माध्यम समुहाच्या सर्वेक्षणात 26 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना आपली पसंती असल्याचे सांगितले, तर देवेंद्र फडणवीस यांना 23 टक्के लोकांनी पसंती दर्शविली होती. याशिवाय 11 टक्के लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत होते. तर 9 टक्के लोकांनी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना आपली पसंती असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे अजित पवार यांना केवळ 7 टक्के लोकांनी दिली होती. या नावांव्यतिरिक्त इतर काही नेत्यांना 24 टक्के लोकांनी पसंती दिली होती.

Tags

follow us