अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील वाळूंज बायपास परिसरात रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान अपघात झाला. एसटी बस आणि वऱ्हाडाची स्कूल बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही बसमधील 20 ते 21 जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर अूसन, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ( Accident of bus and ST Ahilyanagar flyover 20 people injured)
नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील वऱ्हाडी मंडळी लग्न समारंभ आटोपून परत येत होते. वऱ्हाडी हे स्कूल बसमध्ये होते. तर अहिल्यानगर-श्रीगोंदा बस ही श्रीगोंदाकडे जात होती. या दोन्ही बस वाळूंज उड्डाणपुलाखालून जात होत्या. त्याचवेळी दोन्ही बसचा अपघात झाला. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात अधिकारी, मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय
अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत चार जखमींना आपल्या वाहनातून जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उर्वरित पाच जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहेत. काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
