Download App

विखेंची ग्वाही अन् लंकेंचं आंदोलन स्थगित; ‘त्या’ मागण्यांवर सरकार सकारात्मक

कांदा आणि दूध दरवाढीच्या प्रश्नावरुन खासदार निलेश लंके यांनी सुरु केलेलं आंदोलन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ग्वाहीनंतर स्थगित करण्यात आलंय.

Nilesh Lanke News : कांदा आणि दुधाच्या दराबाबत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडलं. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेलं हे आंदोलन अखेर आज चौथ्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ग्वाहीनंतर स्थगित करण्यात आलंय. दरम्यान, आपली निलेश लंके यांची भेट घेण्याचीही तयारी असल्याचं विखे पाटलांनी सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर विखेंनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर लंके यांनी आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा केली.

खासगी गाडीवर लाल दिवा, चेंबरवरही डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकाऱ्याची वाशिमला बदली

रविवारी दुपारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अकोले तालुक्यातील गणारे येथे याच प्रश्‍नांवर दोन शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे यांनी खासदार निलेश लंके यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले होते.

विखेंनी लंकेंना भेटण्याची तयारी दर्शवल्यानंतर आंदोलनातून मार्ग निघण्याची आशा निर्माण झाली. विखे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मंत्री विखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर विखे यांनी आंदोलनस्थळी येत लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काही काळासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा निलेश लंके यांनी केली.

आंदोलनाला राजकीय वळण देण्याची भूमिका नाही….
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. खासदार म्हणून निलेश लंके हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. याला राजकीय वळण देण्याची माझी भूमिका नाही. शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्यांच्या मागण्यांचा सरकार निश्‍चित विचार केला जाणार असून लंके यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केलंय.

अबब! एकट्या मुंबई महापालिकेत 52 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

कांद्यावर निर्यात बंदी उठवण्यात आली असून सरकारने कायमची निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी असून राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न केंद्राकडे मांडणार असल्याचंही आश्वासन विखे पाटलांनी यावेळी दिलं आहे. तसेच राज्यातील सर्व 48 खासदारांना एकत्र करून कांद्याच्या निर्यातबंदीवर काही कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का? यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचंही विखेंनी संगितलंय.

दुध दरवाढीबाबत उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरविले जावेत ही आमची मागणी असून त्यावर कायदा करण्यात येणार असल्याचाही शब्द विखे पाटलांनी यावेळी दिलायं. दुधाला अनुदान न देता दुधाला 40 रूपये दर देण्याची मागणी आम्ही केली आहे. सध्या अधिवेशन सुरू असून अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील यांच्या ग्वाहीनंतर कांदा आणि दूध दरवाढ प्रश्नावर सुरु करण्यात आलेलं आंदोलन विखे यांनी घेतलेल्या मुदतीपर्यंतच स्थगित करण्यात आलं आहे, शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष काही पडल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही. मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

follow us