अहमदनगर : “घरातील लहान पोराने मांडीवर घाण केली म्हणून आपण मांडी कापत नाही किंवा पोराला बाजूला करत नाही. जे संचालक फुटले त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. त्याबाबत मी वरिष्ठांना अहवाल पाठवेन, असं म्हणतं अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी कर्जत बाजार समितीतील वाद आणि त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर रोकठोक शब्दात प्रतिक्रिया दिली. (NCP Ahmednagar District president Rajendra Phalke reaction on Karjat Bajar samiti controversy and BRS joining)
लेट्सअप मराठीशी बोलताना म्हणाले, कर्जत बाजार समितीमधील सभापती निवडीनंतर जे काल माझ्या घराबाहेर घडलं ते फार किरकोळ आहे. अशा गोष्टी राजकारणात होतं असतात. राजकारणात हात-जीत या गोष्टी होत असतात. जे संचालक फुटले त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. पक्षशिस्त असलीच पाहिजे. पक्ष शिस्त पाळणार नाहीत त्यांना पक्षात जागा नसेल. त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींशी बोलून मी जिल्हाध्यक्ष म्हणून अहवाल वरती पाठवेन.
पक्षीय पदाधिकाऱ्याबद्दल पक्षाचेच कार्यकर्ते काही मत मांडू शकतात. त्यांची पद्धत चुकीची असू शकेल. याच्या मागे कोण आहे मला माहिती आहे. पण शेवटी पक्ष मोठा करायचा असतो. घरातील लहान पोराने मांडीवर घाण केली म्हणून मांडी कापायची नसते किंवा पोरालाही बाजूला करायचे नसते. सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवायचा असतो. राहिला प्रश्न रयत शिक्षण संस्थेचा. तर रयत शिक्षण संस्थेवर मी 6 वर्ष काम केले. यंदा मी फॉर्म पण घेतला नव्हता आणि मागणीही केली नव्हती. पण कोणी कोणत्या क्षेत्रात काम करायचे हे शेवटी पक्ष आणि नेतृत्व ठरवत असते.
नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तीन नेत्यांपैकी एक नेता थेट हैदराबादला पोहोचला आहे. हा नेता चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरा बडा नेता म्हणजे राजेंद्र फाळके असल्याचे बोलले जात आहे. मात्र फाळके यांनी या चर्चांना पूर्वविराम देत आपले संपूर्ण राजकारणच हे पवार साहेबांभोवती फिरते, असे सांगितले. जिकडे पवार साहेब तिकडे मी. भारत राष्ट्र समितीमधील कोणत्याही नेत्याशी माझं कसल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही, असंही फाळके यांनी स्पष्ट केलं.
घनश्याम शेलार हे थेट हैदराबादला पोहोचले आहेत. श्रीगोंदा विधानसभ मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ही राहुल जगताप यांनाच मिळणार असल्याची ठाम समजूत शेलार यांची झाली असल्याने त्यांनी नवा पर्याय स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे बोलण्यात येत आहे. राहुल जगताप यांची अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भूमिका वादग्रस्त ठरूनही पक्ष त्यांनाच उमेदवारी देत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. यामुळे आगामी राजकीय वाटचाल डोक्यात ठेवून शेलार भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
तिसरा नेता हा पाथर्डी तालुक्यातील असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानेच हा नेताही बीआरएसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पाथर्डीमधून सध्या माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे आगामी राजकीय पर्यायाची तयारी करण्यासाठी पाथर्डीमधील राष्ट्र्वादीचा हा नेता भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.