NEET Paper Leak : नीट पेपरफुटीमुळे देशात अनेक विद्यार्थ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील जलालपूर येथील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. अंकिता सुरेश सांगळे (19) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. त्यात पुन्हा झालेल्या नीट पेपरमध्ये कमी गुण मिळाल्याने तणावात असल्याचे म्हटले आहे.
अंकिता हिला नीट परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती, असे कुटुंब सांगत आहे. अंकिताचे वडील सुरेश सांगळे व भाऊ हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. घरात आई आणि अंकिता दोघीच होत्या. आई घरातील कामात व्यग्र होती. त्याचवेळी अंकिताने अभ्यासासाठी असलेल्या स्वतंत्र खोलीत गळफास घेतला. बराच वेळ तिची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात अंकिताने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने नैराश्य आल्याचे तिने नमूद केले आहे. तसेच, माझ्या आत्महत्येसाठी माझे आई-वडील, भाऊ किंवा इतर कोणालाही जबाबदार धरू नये,” असेही तिने स्पष्टपणे लिहिले आहे.
परीक्षेत 300 पेक्षा जास्त मार्कची अपेक्षा पण…
नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेतील 300 पेक्षा जास्त मार्कची अपेक्षा अंकिता होती. परंतु 166 मार्क मिळाल्याने ती मानसिक तणावात होती. खासदार निलेश लंके यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. उद्या होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
