पुणे-नाशिक रेल्वे शिर्डी मार्गेच; आमदार सत्यजित तांबेंचा रेल्वेमंत्र्यांवर संताप

Satyajeet Tambe-खरेतर सरकारचे धोरण ठरविताना आर्थिक नफा-तोटा दुय्यम असला पाहिजे तर जनतेचे हित व भावी पिढ्यांचा उद्धार हाच हेतू असला पाहिजे.

Satyajeet Tambe On Ashwini Vaishnaw

Satyajeet Tambe On Ashwini Vaishnaw

Satyajeet Tambe On Ashwini Vaishnaw : प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्ग (Pune-Nashik Railway) अहिल्यानगर-शिर्डी मार्गेच नेण्यात आहे. यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw) यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यावरून आता आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी रेल्वेमंत्र्यांवर संताप व्यक्त केलाय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा प्रश्न सोडवू शकतात, असेही तांबे यांनी म्हटलंय.

दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या 6 खासदारांना ठाकरे गटाचा दणका; पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

आमदार तांबे यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातून जावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. हा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव आल्यावर याविरोधात संगमनेरमध्ये आंदोलने झाली. सरकारी पातळीवर यासाठी पाठपुरावा करण्यात आली. फेरविचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे या आंदोलानाची धग कमी होते ना होते. तोच रेल्वमंत्री वैष्णव यांनी पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गेच नेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता आमदार तांबे यांनी संताप व्यक्त केला आहे.

UBT Crises : 60 वर्षांत 6 बंड, उद्धव ठाकरेंच्या काळातच 4 मोठे धक्के; वाचा बंडाळीचा इतिहास

तांबे यांनी म्हटले आहे की, खरेतर सरकारचे धोरण ठरविताना आर्थिक नफा-तोटा दुय्यम असला पाहिजे तर जनतेचे हित व भावी पिढ्यांचा उद्धार हाच हेतू असला पाहिजे. पण एखादा अधिकारी जर मंत्री झाला तर तो जनतेचं हित न बघता फक्त असंवेदनशीलपणे आर्थिक नफा आणि तोट्याचं गणित बांधतो, याचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आहेत. मंत्री महोदयांनी नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग (नाशिक – सिन्नर – संगमनेर – अकोले – नारायणगाव – राजगुरुनगर – चाकण – पुणे) रद्द करून नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला “खो” घालण्याचं “पाप” केलं आहे. त्यांच्या या असंवेदनशील निर्णयाचा मी तीव्र शब्दात आणि जाहीरपणे निषेध करतो.


शेवटी हा प्रश्न देवेंद्र फडणवीस हेच सोडवू शकतात-सत्यजित तांबे

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागच्याच अर्थसंकल्पात तज्ज्ञ समिती स्थापन करून हा रेल्वेमार्ग रद्द होऊ न देता मार्ग काढण्याचा जो शब्द आपल्याला दिला होता, त्यात त्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. शेवटी हा प्रश्न देवेंद्र फडणवीस हेच सोडवू शकतात, असे सामान्य जनतेचे स्पष्ट मत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वंदे भारत ट्रेनने जेव्हा शिर्डीला आले होते, त्यावेळी सुद्धा मी त्यांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. त्यासोबतच मुंबई ते शिर्डी हे अंतर आणखी 50 मिनिटांनी कमी होऊ शकतं, त्यासाठी नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे नाशिक-शिर्डी या रेल्वे मार्गांवर इंडियाबुल्स कंपनीने आधीच सुमारे 50 टक्के काम पूर्ण केले आहे.


पुण्याहून पुणतांबा हा द्रविडी प्राणायाम का करता ?

त्या कामाला पुढे नेलं, तर हा रेल्वेमार्ग तुलनेने कमी खर्चात पूर्ण होऊ शकतो, यावरही आम्ही चर्चा केली होती. माझी 2011-12 पासूनची अहिल्यानगर ते पुणे रेल्वे दौंड ऐवजी सरळमार्गे व्हावी, अशी ठाम मागणी आहे. त्यासाठी सुद्धा अनेकांनी जनआंदोलन उभं केलं होतं. आता विचार करा, हा प्रकल्प जर 20 वर्षे आधीच झाला असता तर भूसंपादन आणि प्रकल्पाची किंमत खूप कमी लागली असती आणि अगदी स्वस्तात हा प्रकल्प होऊन जनतेचाच पैसा वाचला असता. परंतु या अनुभवातून सुद्धा आपलं रेल्वे मंत्रालय धडा घ्यायला का तयार नाही, पण पुन्हा एकदा पुण्याहून पुणतांबा हा द्रविडी प्राणायाम का करत आहेत, हाच प्रश्न मला वारंवार छळतोय. आज नाशिकहून पुण्याला रस्त्याने जायला साडेचार-पाच तास लागतात.


आमच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचं पाप सरकारने केलंय- तांबे

जर नाशिक-पुणे रेल्वे सरळमार्गे झाली तर हे अंतर अवघ्या पावणेदोन तासांत पार करता येऊ शकतं, पण केंद्रीय मंत्री जनतेचं हित न बघता फक्त आर्थिक चष्म्यातून याकडे बघत आहेत आणि अजून एक अव्यवहार्य प्रकल्प पूर्ण करून आमच्या सर्वांचं भूतो ना भविष्य असं नुकसान करत आहेत. हा प्रकल्प आधीच उशिराने होऊन आधीच आमच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचं पाप सरकारने केलंय, पण आता तर प्रकल्प रद्द करून आमच्या भविष्याला अंधारात टाकण्याचे महापाप सुद्धा केलं आहे. जनतेच्या या आक्रोशाला सरकारला सामोरं जावं लागेल, हे सुद्धा मी यानिमित्ताने ठामपणे सांगत आहे, असेही तांबे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version