Sunil Tatkare On Ashutosh Kale : कोपरगाव शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महायुती शासनाचे पाठबळ आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या मागे उभे आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी कोपरगाव शहराच्या विकास कामांचे प्रस्ताव नगरपरिषदेच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे राज्य सरकारकडे मांडतील, त्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे पाठबळ राहील व भविष्यात आमदार आशुतोष काळे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिलीय.
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते म्हणाले, चोवीस दिवसांनी मिळणारे पाणी तीन दिवसांवर आणणारा नेता आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने या कोपरगाव शहराला मिळाला याचा मला अभिमान आहे. विकासाच्या बाबतीत सामंजस्यपणाने भूमिका घेवून विकासाचे अनेक प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांपुढे मांडले. 2019 पासून दर मंगळवारी मुंबईला त्यांच्याकडे येवून विकास कामांचे कागदाचे गठ्ठे घेवून येतात आणि मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न सोडवून घेत आहेत. (Sunil Tatkare On Ashutosh Kale NCP kopergaon nagarpalika election)
आमदार आशुतोष काळे यांनी सत्तेचा उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी करून पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. तीन पिढीचा समन्वय साधण्याचे काम करून विकासाच्या सुविधा कशा असल्या पाहिजे याचे उत्तम उदाहरण आमदार आशुतोष काळे आहेत. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, भूमिगत गटारीसाठी निधी मिळविला. देखण्या शासकीय इमारती उभ्या केल्या, शहराला विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर घेवून जाण्याचे काम करीत आहे. मागील चार वर्षापासून कोपरगाव नगरपरिषदेला नगरसेवक नसताना आमदार आशुतोष काळे यांनी विकासात खंड पडू न देता नगरसेवकाप्रमाणे कोपरगावकरांना सेवा दिली. त्यांना कोपरगाव शहराच्या विकासाची जाण असून त्यांनी धडाकेबाज काम करण्याचा कणखरपणा दाखवला. भविष्यात विकासाची घौडदौड अशीच सुरु राहावी यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. ज्या पद्धतीने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी चोख व्यवहार ठेवून पतसंस्था उभी केली. त्याच पद्धतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराची उभारणी करतील, असा विश्वास व्यक्त केला. काळाची पावलं ओळखणारा नेता जेव्हा त्या शहराला मिळतो. त्यावेळी वडीलधारी नेतृत्वाला देखील शहराच्या विकासासाठी तरूण नेतृत्वाच्या पाठीशी उभे रहावे ही किमया आमदार आशुतोष काळे यांना जमली असून त्यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
युट्युबने केला मोठा बदल! मित्रांसोबत चॅट आणि व्हिडिओ करू शकता शेअर, वाचा सविस्तर
कोपरगावकरांना नियमित पाणी द्यायचे हा माझा शब्द: आशुतोष काळे
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, 2016 ला 23 दिवसांनी कोपरगावच्या नागरिकांना पाणी मिळत होते. कोपरगावकरांनी मला 2019 ला विधानसभेत पाठविले मी 131 कोटीची पाणी योजना मंजूर करून आणली, पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण केल्यामुळे आज चार दिवसांनी पाणी मिळते. परंतु मी यावर थांबणार नाही. एक ते चार साठवण तलावाचे काम पूर्ण करून कोपरगावकरांना नियमित पाणी द्यायचे हा माझा शब्द आहे. कोपरगाव शहराच्या विकासाच्यादृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. कोपरगाव शहरात 2019 पासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीत मोठा बदल झाला आहे. पाण्याचा प्रश्न मिटल्याबरोबरच महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित रस्त्यांची कामे येत्या काळात पूर्ण होणार आहे. भूमिगत गटारीसाठी निधी आणला असून अनेक मंजूर विकासकामे होणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. कोपरगाव नगरपरिषद निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे काही करून त्यांना ही निवडणूक जिंकायची आहे. मात्र कोपरगावचे मतदार सुज्ञ आहेत जरी ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वाची असली तरी हि निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
विरोधकाकडून विकासकामांत अडथळे-कोयटे
याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोयटे म्हणाले की, मी जनतेच्या मनातला माणूस आहे. जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून विरोधक खोटे न्यायालयीन दावे करत आहेत. परंतु त्यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावचा सर्वांगीण विकास होत आहे. मात्र हे विरोधकांना पाहवत नसल्याने ते विकासकामांत अडथळे निर्माण करत आहेत. खोटं बोल, पण रेटून बोल हीच विरोधकांची नीती आहे, आणि या नीतीला आपण ठामपणे प्रत्युत्तर देणार आहे. माझा एकच ध्यास आहे, कोपरगावचा विकास. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत कोपरगावच्या प्रगतीसाठी काम करत राहीन. माझा मोबाईल आणि माझ्या घराचे दरवाजे हे कायम कोपरगावच्या जनतेसाठी खुले आहेत.
तुम्हीच ठरवा उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ द्यायची की मुख्यमंत्री फडणवीसांना?, मंत्री दादांचं मोठ विधान
याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर,आ. आशुतोष काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, शहराध्यक्ष सुनील गंगुले, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, सर्व संचालक, राष्टवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्ह्यांना काका आंबट-आशुतोष काळे
आपल्याकडे द्राक्षाला कोल्हे आंबट अशी म्हण प्रचलित आहे, म्हणीचा अर्थ ज्या गोष्टी आपण मिळवू शकत नाही किंवा ज्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्यावेळी त्या गोष्टीला नावे ठेवायची किंवा चुकीचे ठरवायचे असंच काकासाहेब कोयटे यांच्या बाबतीत घडतांना दिसून येत आहे. जोपर्यंत काका त्यांच्या सोबत होते. त्यावेळी त्यांच्यासाठी ते चांगले होते. परंतु आता ते आपल्याकडे आले तर विरोधक त्यांच्यावर खालच्या पातळीवरची टीका करीत आहे. त्यामुळे कोल्ह्यांना द्राक्षे आंबट अशी म्हण असली तरी आता कोल्ह्यांना काका आंबट असे म्हणावे लागेल, अशी टीका आमदार आशुतोष काळे यांनी केलीय.
मी 2019 ला निवडून आल्यानंतर दोनच महिन्यात पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू केले. त्यावेळी साठवण तलाव होऊ नये व कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटू नये यासाठी विरोधक न्यायालयात गेले. व थोड्याच दिवसात मी मंजूर करून आणलेल्या कोपरगाव शहरातील 28 विकासकामांना स्थगिती मिळवण्याचे पाप त्यांनी केले. यामागे त्यांची एवढी एकच पोटदुखी होती की त्या कामाचे श्रेय मला मिळू नये. याबाबत वेळोवेळी मी प्रसारमाध्यमांद्वारे सांगत होतो. त्याचा प्रत्यय या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आला. छाननीच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचे व त्यांच्याही सर्व उमेदवारांचेही उमेदवारी अर्ज वैध झाल्यानंतर पायाखालची जमीन सरकू लागल्यामुळे कुठलाही आधार नसताना ते आज न्यायालयात गेले. यावरून आजपर्यंत मी त्यांच्या बाबत जे काही बोलत होतो ते त्यांनी आज सिद्ध केले, असे काळे म्हणाले.
