मुंबई : देशात यंदा मान्सूनच्या पावसाचं (Rain update) आमगन उशिरानं झालं होतं. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. पावसाचा असाच जोर कायम राहिल असं वाटत होतं. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. त्यामुळं ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला. मात्र, राज्यभराता पाऊस पडण्याची अपेक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आटवड्यात पूर्ण होण्यचाी शक्यता आहे.
कमी दाबाचं क्षेत्र अन् चक्रीवादळ यामुळं पावसाला चालना मिळेल, असं हवामान खात्याचे काही अधिकारी सांगत होते, तर काही अधिकारी त्यामुळे मान्सूनला फारशी चालना मिळणार नसल्याचे सांगत होते. दोन दिवसांपासून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात विविध ठिकाणी पावसाची सर अनुभवता आली. सोमवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 ते 31 ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रामुख्याने विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
आजपासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद, नियमांचे उल्लंघन केल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास, 25 हजारांचा दंड
सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तिन्ही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात मान्सून खंडामुळं पावसाची आकडेवारी सरासरीच्या ९३ टक्के झाली आहे. तर राज्यात ही सरासरी ९५ टक्क्यांवर आली आहे. ऑगस्टच्या उर्वरित दिवसांमधील खंडामुळं ही आकडेवारी अधिक खाली घसरण्याची शक्यता आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला भारतीय हवामान खात्याने पुढील दोन महिन्यांचा अंदाज व्यक्त करताना या दोन महिन्यांत सरासरी पाऊस पडेल, असे सांगितले होते. पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्ये ही कमतरता भरून काढणे शक्य आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. मात्र, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज आहे.
सध्या एल निनोचा प्रभाव वाढत आहे. आतापर्यंत समुद्राचे तापमान वाढत होते. मात्र, आता वातावरणातील हवाही तापू लागली आहे. त्यामुळे ढगांची निर्मिती आणि पावसावरही परिणाम होणार आहे. तर IOD (Indian Ocean Dipole) सकारात्मक होत आहे. याचा फायदा भारतातील पावसाला होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात या दोन घटकांचा पावसावर कसा परिणाम होत आहे, याकडे अधिक लक्ष असेल, असे होसाळीकर म्हणाले.