काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल असं म्हणत (Baranati) खासदार पार्थ पवार यांनी टीका केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची ‘राजकीय परिपक्वता’ काढत कानउघडणी केली होती. तर, काँग्रेसनेही ‘कृतघ्न’ म्हणत पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. आता, पार्थ यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांचे बंधू आमदार रोहित पवार यांनीही त्यांना चांगलच फटकारलं आहे.
रोहित पवार म्हणाले, फॉर्म भरण्याची एक तारीख असते आणि मागे घेण्याची दुसरी तारीख असते. अर्ज मागे घेण्यास सांगण्यासाठी संवाद गरजेचा असतो. चर्चा करायची असते, परिक्वतता दाखवली पाहिजे. पार्थचे विधान घाईगडबडीत झालेले आहे. सुनेत्रा पवार, छगन भुजबळ किंवा इतर नेते काँग्रेसशी संवाद साधतील.
पार्थ पवारांकडे परिपक्वता आहे की नाही, माहिती नाही अशी कानउघडणी शरद पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानानंतर केली होती. याबद्दल विचारल्यार रोहित पवारांनी म्हटले, तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधात जमिनीवर राहणं फार महत्त्वाचं असतं. पार्थचे विधान योग्य नव्हतं. कुठंतरी घाईगडबड आपल्याला जाणवली आहे. कुठलाही पक्ष संपत नसतो. सगळे पक्ष आपल्या तऱ्हेने ताकद लावत असतात. दुसऱ्या पक्ष संपला वगैरे बोलणे उचित नव्हतं.
पार्थला आता त्या विधानाबद्दल जाऊन विचारले तर तो बोलेल, ‘मी बोलून गेलो. नाहीतर माझ्या म्हणण्याच्या दुसरा अर्थ काढला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ( अजित पवार ) कुणीतरी काँग्रेसला बोलेल अशी अपेक्षा ठेवतो. काँग्रेसनं पार्थ पवारांवर ‘कृतघ्न मुलगा’ अशी टीका केली होती. यावर रोहित पवार म्हणाले, पार्थ अजित पवारांच्या अपघातप्रकरणी प्रयत्न करत होता. त्यासोबत जय सुद्धा खऱ्या गोष्टी बाहेर याव्यात म्हणून प्रयत्न करत होता.
सीबीआयकडे हा प्रस्ताव देण्यात याव्या, ही संकल्पना पार्थ, सुनेत्रा काकी आणि जयची असेल. पार्थची काँग्रेसबाबत भूमिका चुकीची होती. पण, पार्थची अजितदादांबद्दलची भूमिका ही कुठल्याही मुलाची जशी भावना वडिलांबाबत असते, तशीच आहे, हे मी आत्मविश्वासाने सांगतो. पार्थ हा माझा भाऊ आहे. वडील आणि मुलाबाबत लिहिणे काँग्रेससाठी योग्य नाही. अजितदादांप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नव्हता. पण, काँग्रेसशासित राज्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. यासाठी मी आभार मानलेले आहेत.
