Download App

..तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवारांची मोठी मागणी

गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Reaction on Baba Siddiqui Murder : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर शरद पवार यांनी खेद व्यक्त केला असून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची हत्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा असून याची चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारावी आणि सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Video : अत्याचार करणाऱ्या शिंदेंला गोळी घालणं योग्यच; दिघेंनीही गोळ्या घातल्या असत्या पण

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

सत्तेत असलेल्या नेत्याला अशा प्रकारे भररस्त्यात गोळ्या घातल्या जातात हे धक्कादायक असून कायदा आणि सुव्यस्था ढासळल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. अजित पवार गटाच्या दोन नेत्यांची एकाच आठवड्यात हत्या करण्यात आली, गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

follow us