अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत (NCP) मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. काही नेत्यांमध्ये आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव नमूद करण्यात आले आहे. तसंच, पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे.
अजितदादा अडचणीत असताना नाही पण तटकरेंसाठी.., शेळकेंच्या वक्तव्याचा रोहित पवारांकडून समाचार
निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या या पत्रात पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची नावे प्रमुख पदांमध्ये नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, मात्र, सुनिल तटकरे यांच्या नावासमोर हे पद नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षात त्यांना जाणीवपूर्वक बाजूला केले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की, आमच्या केंद्राच्या ऑफिस बेररमध्ये सुनील तटकरे यांचं नाव आहे त्यामुळे आजही ते प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पत्र आहे ते राष्ट्रीय कार्यकारणी बाबत आहे असं विधान केलं आहे. दरम्यान, याआधी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत सुनेत्रा पवार यांच्यात नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पत्रात तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही, त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
