माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे () हे सध्या ज्या ज्या मतदारसंघातील खासदारांनी बंडखोरी केली, त्या त्या मतदारसंघात सभा घेत आहेत. आज धाराशिवमध्ये बोलताना, ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाऊ शकते, असं भाकित केलं आहे. तसंच फडणवीसांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
हे गद्दार शिंदे सेनेत, मिंधे सेनेत म्हणजेच गुलाम सेनेत गेले आहेत. त्या गुलामांचा काही भवितव्य नाही. कारण वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे. हे सहा खासदार भाजपात का गेले नाही. भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी आहे. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच येत्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तर मला नवल वाटणार नाही, असं म्हणत फडणवीसांसोबत कटकारस्थान सुरू असल्याचंही ते म्हणाले.
वाघाचं कातडं पांघरलेला हा लांडगा होता; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा घणाघाती वार
सध्या मोठं कटकारस्थान सुरू आहे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. एखाद्या व्यक्तीनंतर पुढची व्यक्ती कोण, याबाबत विचार केला जातो. दिल्लीत पंतप्रधानपदी बसले आहेत, त्यांच्या जागेवर आता दुसरा नेता कोण? याबाबत विचार सुरू झाला आहे. या पदासाठी भाजपातच रस्सीखेच सुरू झाली आहे. जे-जे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत, त्या सर्वांचा पत्ती 2029 पर्यंत कट होतो की नाही ते बघा. आता तीन वर्ष राहिले आहेत.
शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होती. त्यांच्याच चेहऱ्यावर भाजपाने मध्यप्रदेशची निवडणूक जिंकली. चौहान तिथे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. त्यांना दिल्लीत बोलावले गेलं आणि अडगळीत टाकून देण्यात आलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आता त्यांचं कोणीही नाव घेत नाही. ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले असते म्हणून त्यांच्यासोबत असं झालं, असंही ठाकरे म्हणाले.
