Yogesh Kadam on Nagpur Violence : नागपूर शहरात सोमवारी रात्री मोठा (Nagpur Violence) राडा झाला. दोन्ही गटात दंगल उसळून जोरदार दगडफेक झाली. संतप्त जमावाने परिसरातील दुचाकी चारचाकी वाहनांना आगाी लावल्या. हा कट पूर्वनियोजित असल्याचा दावा आता केला जात आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन राजकारण सुरू झाले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सगळ्या घडामोडींत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी (Yogesh Kadam) महत्वाचे वक्तव्य केले आहे. नागपूरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे असे मंत्री कदम म्हणाले आहेत.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कदम म्हणाले, सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. काही भागात वाहने, दुकाने आणि घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी लोक थेट घरात घुसले होते. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर.. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांचा इशारा
दंगलीच्या घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली. रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन चालवून 80 संशयित दंगेखोरांना अटक करण्यात आली. तसेच काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मंगळवारी सकाळपासून दंगलग्रस्त भागात तणावपूर्ण शांतता आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली. दंगल का घडली, कुणामुळे घडली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
तर दुसरीकडे पोलिसांनी नागपुर शहरात कलम 144 लागू करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. तसेच संचारबंदी लागू करण्यात आल्याने पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. शहरातील परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, 80 जणांना अटक, ‘या’ भागात भागांमध्ये संचारबंदी लागू