Download App

Nagpur : दोन तासांचा पाऊस दोन महिलांच्या जीवावर बेतला; 400 जणांची सुटका; जनावरांचीही जिवीत हानी

नागपूर : मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने संपूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये, घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (80 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर पुराच्या पाण्यातून दिवसभरात सुमारे 400 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सर्वांना फूड पॅकेट्स व अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. (Two women die in floods caused by heavy rains in Nagpur, 400 citizens evacuated safely)

नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. सतत दोन तास विजांचा कडकडाटासह चार तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या दोन तासांमध्ये ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.

Nagapur Rain : रस्त्यावर तरंगणाऱ्या बसेस, दुकाने अन् घरांमध्ये पाणी; नागपुरात पावसाची ‘न भुतो न भविष्यती’ बॅटिंग

बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. 400 नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले. या सर्वांना फूड पॅकेट्स व अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात आल्या. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ बरोबरच लष्करांच्या तुकड्यांनाही रेस्क्यू करण्यासाठी प्रशासनाने पाचारण केले होते. दरम्यान, दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, असेही सांगण्यात आले.

Nagpur Rain Update : नागपुरात नेमकी परिस्थिती कशी?; फडणवीसांनी सांगितली ग्राउंड रिअ‍ॅलिटी

14 जनावरेही दगावली :

हजारीपहाड (सह्याद्री)या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज