Download App

अखेर निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सुटले; शेती सिंचनाला होणार फायदा

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. अखेर आज डाव्या कालव्यातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचे वातावरण आहे.

मी कुणाचाही लॉयल डॉग नाही, जरांगेंची सभा म्हणजे यात्रा; गुणरत्न सदावर्ते यांचा जोरदार पलटवार 

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी महसूल मंत्र्यांचे निळवंडे येथे आगमन झाल्यावर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट जमीन बसून चर्चा केली. कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.

यावेळी पालकमंत्री विखे म्हणाले, उच्चस्तरीय कालव्यांची चाचणी करून ३० ऑक्टोंबर पर्यंत पाणी सोडण्यात येईल. उच्चस्तरीय कालव्यांतील वरच्या भागात वंचित राहिलेल्या १७०० हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याच्या दृष्टीने दसऱ्यापूर्वी लोणीला शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल.‌ प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्यात येऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशा शब्दात महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

डाव्या कालव्याच्या चाचणीवेळी पाणी गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे स्वतंत्र पंचनामे करून नियामक मंडळाकडे भरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. कालव्यांसाठी अतिरिक्त भूसंपादन केलेल्या शेतजमिनी पडून आहेत. अशा शेतजमिनी मूळ शेतकऱ्यांना वर्ग करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री विखेंनी सांगितलं.

पाणी सोडल्यानंतर महसूल मंत्र्यांनी सावरगाव पावसा येथे उजवा कालवा साईट पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

https://www.youtube.com/watch?v=6LHAcWXiT34

यावेळी‌ माजी आमदार वैभव पिचड, निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, उप विभागीय अभियंता जी. व्ही. मगदूम , संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, अकोले तहसीलदार सतीश थिटे व मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

 

 

 

Tags

follow us