Sanjeev Sonawane Suicide : शिक्षण क्षेत्रात मोठं नाव असलेले (Teacher) संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (62) यांचा लातूर शहरातील पद्मानगर येथील राहत्या घरी मृत्यू झाला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सोनवणे यांचा लातूरसह सोलापूर आणि येडशी येथे शिक्षण संस्थांशी संबंध होता. लातूरमध्ये ‘शिक्षणाची पंढरी’ अशी ओळख निर्माण झालेली असताना मागील काही काळात खासगी शिकवणी वर्गांचा वाढता प्रभाव हा महाविद्यालयांसाठी अडचणीचा विषय ठरत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सोनवणे तणावात असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून समोर आली आहे.
दरम्यान, मृत्यूपूर्वी सोनवणे यांनी चिठ्ठी लिहिल्याची माहिती आहे. आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, तसेच या घटनेचा तपास करू नये, असा मजकूर त्या चिठ्ठीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चिठ्ठीतील मजकूर आणि त्यामागील परिस्थितीबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सोनवणे यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. खासगी शिकवणीच्या वाढत्या प्रभावामुळे महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणींमुळे सोनवणे अस्वस्थ असल्याचे त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास
संजीव सोनवणे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण बेंगळुरू येथील सिद्धगंगा कॉलेज, तुमकुर येथे घेतले. त्यांचे वडील चंद्रभानू सोनवणे हे औरंगाबाद विद्यापीठात हिंदी साहित्य विभागाचे प्रमुख होते.
परळी येथे संकल्प कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कामाची सुरुवात केली. त्यानंतर सन २०० मध्ये च्या आसपास लातूर येथे संकल्प कोचिंग क्लासेसची स्थापना केली. पुढे २००५ च्या सुमारास चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
यानंतर बार्शीजवळील उकडगाव येथे शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आले. सुमारे तीन वर्षांपूर्वी खडकवासला येथेही शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक विस्तार केला होता. खाजगी शिकवणीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास शिक्षण संस्थांचे मोठे जाळे उभे करण्यापर्यंत पोहोचला.
