मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ, जोरदार वारा आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विशेषतः आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. (Marathwada) नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर यावर्षी आंबा उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता असल्याची माहिती हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.
हिमायतबागेतील केसर आंबा गुणवत्ता केंद्रातर्फे सलग दोन दिवस नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, शंकरपूरवाडी, तालुका खुलताबाद आदी भागातील आंबा व मोसंबी बागांना भेट देण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी अनिल परांजपे यांनी सांगितलं की, आमच्या बागेतील आंब्याचे ३० टक्के नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहर साधारण एक महिना उशिराने आला.
मोहराच्या काळात कडाक्याची थंडी दीर्घकाळ टिकल्याने फुलांचे फळात रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावली. त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आणि उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये काढणीच्या टप्प्यात असलेले गहू, हरभरा, आंबा, डाळिंब, भाजीपाला तसेच कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कराड शहरातही पाऊस
कराड शहर आणि परिसराला गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या तडाख्यात सरींसह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल दीड तास कोसळलेल्या या पावसामुळे शहरासह नजीकच्या ग्रामीण भागातील जनजीवन काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाले.
गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार कराड परिसरात अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या.मात्र गुरुवारी अचानक जोरदार पावसाने हजेरीलावत नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडवली.
