Download App

‘मी दिलगिरी व्यक्त करतो, निलंबनाचा फेरविचार करा’; कारवाईनंतर दानवे नरमले

अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे. 

Ambadas Danve : विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यातील (Prasad Lad) वाद केंद्रस्थानी आहे. दानवे यांनी आमदार लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. या प्रकाराची दखल घेत सभापती नीलम गोऱ्हे यांनी काल अंबादास दानवेंना पाच दिवसांसाठी निलंबित केलं होतं. विरोधकांनी या कारवाईचा निषेध केला मात्र उद्धव ठाकरे यांनी या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आज अंबादास दानवे यांनीही सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे.

मोठी बातमी! अखेर अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित; शिवीगाळ प्रकरणी कारवाई

नेमका वाद काय?

लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदू समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केल्याने भाजपच्या आमदारांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यामध्ये अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. या वादामुळे गोंधळ झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. एकूणच या वादानंतर अंबादास दानवे यांनी मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद असल्याचं म्हणत दानवेंनी धमकावल्याचे प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

या प्रकरणी वाद चांगलाच वाढला होता. काल दिवसभर याच प्रकाराची चर्चा सुरू होती. भाजप नेते तर दानवेंवर तुटून पडले होते. यानंतर दानवेंनीही स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतरही विधानपरिषदेत या वादाचे पडसाद उमटले. दानवेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल सकाळी प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. त्यानंतर सभागृहात भाजप आमदारांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता.

अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. यानंतर सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं. या निर्णयावर विरोधकही चांगलेच संतापले होते. त्यांनी सभागृहात जोरदार  घोषणाबाजी केली.

लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांची मोठी खेळी, अयोध्येचा खासदार भाजपचा खेळ बिघडवणार? 

काय म्हणाले दानवे ?

सभागृहाचा सदस्य म्हणून मी सभागृहाच्या परंपरेचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र 1 जुलै रोजी अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केलं. सभागृहाचं पावित्र्य राखण्यासाठी माझ्या मनात कोणताही किंतू नाही. माझं निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडण्यापासून रोखण्यासारखे होईल. त्यामुळे माझ्या निलंबनाचा फेरविचार व्हावा, असे अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज