Download App

आंदोलक कुस्तीपटूंची मागणी मान्य होणार? राज ठाकरेंचे PM मोदींना पत्र

Raj Thackeray Letter To PM Modi : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आंदोलक कुस्तीपटूंची मागणी आहे. परंतु यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. याविरोधात कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. कुस्तीपटूंना सर्व स्तारातून पाठिंबा मिळत आहे. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यात वादात उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कुस्तीपटूंना न्याय देण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे आपल्या पत्रात लिहितात, ”नरेंद्र मोदीजी, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही “बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होती. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवासस्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

महिला आयोगाची दिल्ली पोलीसांना नोटीस, पीडित मुलीची ओळख उघड कशी झाली?

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे.”

Tags

follow us