मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजारीशी झुंज देणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज 73 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे आणि गिरीश बापट असे एक अनोखं नातं होतं. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.’महाराष्ट्राच्या राजकाणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा गिरीश बापट यांच्या सारखा नेता आपल्याला सोडून गेला’, असे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शोक संदेशात म्हटले की, ‘गिरीश बापट गेले. राजकारणातल्या जुन्या वळणाचा उत्तम माणूस म्हणुन त्यांची ओळख होती. शिवसेना भाजपा युती असताना ज्यांनी सतत युती टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न केले असे बापट होते. सगळ्यांना एकत्र ठेवणारा दिलदार नेता अशी त्यांची किर्ती होती. गिरीश बापट आणि पुणे असे एक समीकरण बनले होते.. शिवसेनेशी त्यांचा विशेष स्नेह होता..अनेकदा खुलेपणाने ते मातोश्रीवर येत जात होते. महाराष्ट्राच्या राजकाणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा गिरीश बापट यांच्या सारखा नेता आपल्याला सोडून गेला. आई जगदंबा त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो..’
Girish Bapat : पुण्याची ताकद गिरीश बापट…! घोषणेने गिरीश बापट यांना अखेरचा निरोप
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येत त्यांनी पुण्यावर वर्चस्व ठेवले होते. 2014 सालच्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते, सोबतच पालकमंत्रीही होते. 2019 मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. खासदार गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता.