Vijay Vaidya Vasant Vyakhyanmala At Borivali : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य (Vijay Vaidya) यांनी बोरीवली (Borivali) पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली 42 वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही 43 व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला ( Vasant Vyakhyanmala) आहे. सोमवार दि. 28 एप्रिल, मंगळवार दि. 29 एप्रिल आणि बुधवार दि. 30 एप्रिल 2025 असे तीन दिवस ही वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
विजय वैद्य यांच्या संकल्पनेप्रमाणे समाजाला बौद्धिक मेजवानी देण्याचा उद्देश कार्यकर्त्यांनी कायम जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत देण्यात येणारे जय महाराष्ट्र नगर भूषण, शारदा आणि प्रेरणा हे तीन पुरस्कार सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार 28 एप्रिल 2025 रोजी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प जीवनविद्या मिशनचे व्याख्याते प्रा. शैलेश रेगे हे ‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर गुंफणार असून मंगळवार, 29 एप्रिल 2025 रोजी हत्ती मित्र श्री. आनंद शिंदे हे ‘एक संवाद हत्तीशी’ या विषयावर अत्यंत वेगळा विषय मांडणार आहेत.
भारतीय ऐवजी धर्माच्या आधारावर…पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया चर्चेत
सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रातील अडचणी संदर्भात बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी हे ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे कां?’ या विषयावर बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी मार्गदर्शन करणार आहेत. एकता विनायक चौक, टाटा संग्राही केंद्रा (टाटा पॉवर हाऊस) समोर, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही वसंत व्याख्यानमाला होणार आहे.
विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या परंपरा, प्रथेप्रमाणे यंदा जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटकर यांना, शारदा पुरस्कार आपल्या सुमधूर वाणीने तमाम रसिकांना गेली 45 वर्षे मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांना तसेच प्रेरणा पुरस्कार बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या मनमिळावू, मितभाषी अध्यक्षा रुचिराताई दिघे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
बीड जिल्ह्यातली धक्कादायक घटना; कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दहा पीडितांची सुटका
ही व्याख्यानमाला विनामूल्य असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून 43 वर्षांपूर्वी विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा. आपापल्या सक्रीय सहकार्याचा हातभार लावावा, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या वतीने सचिन वगळ आणि प्रा. सौ नयना रेगे यांनी केले आहे. विजय वैद्य यांनी सुरु केलेली ही जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यापुढे सुरु ठेवण्यासाठी वैशाली विजय वैद्य, वैभव विजय वैद्य आणि विक्रांत विजय वैद्य यांनी अनुमती दिली आहे. त्यांचेही यथोचित सहकार्य लाभणार आहे.