7 new high-speed rail corridors to be built in the country : देशात लवकरच 7 नवे हाय-स्पीड रेल कॉरिडोर उभारले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर करताना ही महत्त्वाची घोषणा केली. या हाय-स्पीड रेल प्रकल्पांमुळे देशातील आर्थिक, औद्योगिक, आयटी आणि धार्मिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थमंत्र्यांच्या मते, हे हाय-स्पीड रेल कॉरिडोर स्वतंत्रपणे विकसित केले जाणार असून त्यामागचा उद्देश म्हणजे रस्ते आणि पारंपरिक रेल्वे नेटवर्कवरील वाढता ताण कमी करणे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून व्यापार, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
कोणती शहरं जोडली जाणार?
या 7 हाय-स्पीड रेल कॉरिडोरद्वारे देशातील एकूण 8 महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, वाराणसी आणि सिलीगुडी या शहरांचा समावेश आहे. हे कॉरिडोर देशातील फायनान्शियल सेंटर, आयटी हब, मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि धार्मिक केंद्रांना एकमेकांशी जोडतील, असा सरकारचा दावा आहे.
ही 8 शहरे का आहेत महत्त्वाची?
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी
मुंबई ही देशाची फायनान्शियल कॅपिटल म्हणून ओळखली जाते. RBI, SEBI, BSE, NSE यांसारख्या प्रमुख आर्थिक संस्था येथे आहेत. बँकिंग, शेअर बाजार, विमा, म्युच्युअल फंड आणि कॉर्पोरेट मुख्यालयांचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबई. रिलायन्स, टाटा, अदानी, L&T यांसारख्या दिग्गज कंपन्यांची मोठी ऑपरेशन्स इथून चालतात. बंदर, व्यापार, मनोरंजन उद्योग आणि रिअल इस्टेटमुळे मुंबईचा अर्थव्यवस्थेतील वाटा अत्यंत मोठा आहे.
पुणे – ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग आणि MSME हब
पुणे हे महाराष्ट्राचं दुसरं आर्थिक इंजिन मानलं जातं. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ यांसारख्या कंपन्यांमुळे ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात पुण्याचं मोठं योगदान आहे. हिंजवडी, मगरपट्टा, तळेगाव परिसरातील आयटी क्लस्टर, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांमुळे पुणे ‘पूर्वेचं ऑक्सफर्ड’ म्हणूनही ओळखलं जातं.
तरुणांना रोजगार नाही, शेतकरी त्रस्त अन्…, अर्थसंकल्पावर नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
हैदराबाद – ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया
हैदराबाद हे देशातील प्रमुख आयटी आणि ग्लोबल टेक हब आहे. मायक्रोसॉफ्ट, गूगल, अमेझॉन, अॅपल, टीसीएस यांसारख्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. औषधनिर्मिती, लसींचा निर्यात व्यवसाय, फार्मा पार्क आणि मेडिकल डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंगमुळे हैदराबादला ‘ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हटलं जातं. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या शहराचा वाटा मोठा आहे.
बेंगळुरू – भारताची सिलिकॉन व्हॅली
बेंगळुरू हे देशाचं आयटी राजधानीचं शहर आहे. सर्वाधिक स्टार्टअप्स, युनिकॉर्न कंपन्या आणि सॉफ्टवेअर एक्सपोर्ट इथूनच होतो. IISc, ISRO, DRDO, IIM-B यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमुळे संशोधन आणि नवकल्पनांचं हे प्रमुख केंद्र आहे.
चेन्नई – भारताची ऑटोमोबाईल कॅपिटल
ह्युंदाई, रेनॉल्ट, निसान, बीएमडब्ल्यू, अशोक लेलँड यांसारख्या कंपन्यांचे मोठे उत्पादन प्रकल्प चेन्नईत आहेत. ऑटो एक्सपोर्ट, बंदरे, लॉजिस्टिक्स, आयटी आणि शैक्षणिक संस्थांमुळे चेन्नई ही तमिळनाडूच्या अर्थव्यवस्थेची कणा मानली जाते.
दिल्ली – राष्ट्रीय धोरणांचं केंद्र
देशाची राजधानी दिल्ली ही केवळ राजकीय नाही तर आर्थिक दिशा ठरवणारं शहर आहे. केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, धोरणकर्ते, नियामक संस्था याच शहरात आहेत. येथील निर्णयांचा थेट परिणाम उद्योग, गुंतवणूक आणि बाजारावर होतो.
Video : देशाचा अर्थसंकल्प सादर! हा युवा शक्तीचा अर्थसंकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
वाराणसी – देशाची धार्मिक राजधानी
काशी विश्वनाथ मंदिर, गंगा आरती आणि ऐतिहासिक वारसा यामुळे वाराणसी हे देशाचं प्रमुख धार्मिक केंद्र आहे. कोट्यवधी भाविक आणि पर्यटकांमुळे धार्मिक पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. बौद्ध सर्किटचा महत्त्वाचा भाग म्हणूनही वाराणसी ओळखली जाते.
सिलीगुडी – ईशान्य भारताचं लॉजिस्टिक गेटवे
सिलीगुडी हे ईशान्य भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं रणनीतिक आणि लॉजिस्टिक केंद्र आहे. इथूनच ईशान्येकडील 8 राज्यांची पुरवठा साखळी चालते. दार्जिलिंग चहा, कृषी उत्पादनांचा व्यापार आणि सीमावर्ती स्थानामुळे सिलीगुडीचं महत्त्व वाढत आहे.
एकूणच, हाय-स्पीड रेल कॉरिडोरमुळे देशातील आर्थिक विकास, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राष्ट्रीय एकात्मतेला नवी गती मिळणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
