प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारताला (India) ‘विश्वगुरू’ म्हणण्याच्या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी, “विश्वगुरू, विश्वगुरू म्हणणं हा मूर्खपणा थांबवा,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. देशातील शिक्षण, आरोग्य आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पौडवाल यांनी अनेक शाळा बंद पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. देशात शिक्षणाची अवस्था सुधारण्याची गरज असताना ‘विश्वगुरू’ होण्याच्या घोषणा वास्तवापासून दूर असल्याचे त्यांनी म्हटले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यावर सरकारने अधिक लक्ष केंद्रित करावे, असे त्यांचे मत आहे.
पंतप्रधान मोदी विश्वगुरू, पण खलिस्तानवाद्यांचा; ठाकरे गटाचा निशाणा
राम मंदिराचाही त्यांनी आपल्या वक्तव्यात उल्लेख केला. मंदिरासारख्या भावनिक मुद्द्यांपेक्षा जनतेच्या मूलभूत गरजा आणि विकासाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. देशाची खरी प्रगती ही नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अनुराधा पौडवाल यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या भाष्याची विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहे. समर्थक आणि विरोधकांकडून त्यांच्या मतांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, ‘विश्वगुरू’ या संकल्पनेबाबत नव्याने चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
