Download App

मुलांच्या आरोग्यासाठी CBSE चा मोठा निर्णय; देशभरांतील शाळांत आता ‘शुगर बोर्ड’

देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.

Sugar Board in CBSE School : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मन की बात कार्यक्रमात शाळांतील ‘शुगर बोर्ड’चा उल्लेख केला होता. यानंतर आश्वासक प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.

एका दिवसात किती साखर खाल्ली पाहिजे? दैनंदीन गरजेच्या खाद्यपदार्थांत किती साखर असते याची माहिती या फलकांवर लिहिलेली असावी अशा सूचना दिल्या आहेत. ग्लोबल स्कूलच्या प्रिंसिपल डॉ. गायकवाड यांनी सांगितले की शिक्षण विभागाने सर्व शाळांत येत्या 15 जुलैपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

भारताची तुलना जगातील सर्वाधिक मधूमेहग्रस्त (Diabetes) देशांत होत आहे. अन्य आजारही देशात वेगाने फैलावत आहेत. यासाठी लहान वयातच मुलांना याबाबत माहिती देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मधुमेह आधी फक्त वयस्कर लोकांतच आढळून येत होता. आता मात्र लहान मुलांनाही मधुमेह होत आहे. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे साखरेचे अति प्रमाणात सेवन, फास्टफूड खाण्याची सवय हे आहे. त्यामुळे लहान वयातच या गोष्टींची माहिती मुलांना असणे गरजेचे आहे. याचा विचार करून सीबीएसई परीक्षा बोर्डाने सर्व शाळांत शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.

वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींचं भाष्य; ‘मन की बात’मधून देशवासियांना दिला ‘हा’ सल्ला

कसं असेल शुगर बोर्ड

शुगर बोर्डमध्ये अति प्रमाणात साखर खाल्ल्यास त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली जाईल. यामुळे मधुमेहासह अन्य कोणते आजार होऊ शकतात याचीही माहिती असेल. शाळेच्या भिंतींवर पोस्टर लावण्यात येतील. एका दिवसात किती साखर खाल्ली पाहिजे. चॉकलेट, जूस, कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या पदार्थांत किती साखर असते याची माहिती दिली जाईल. याशिवाय या बाबतीत अधिक माहिती देण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्याच्याही सूचना आहेत. शाळांनी 15 जुलैच्या आधी एक संक्षिप्त अहवाल आणि काही फोटो सीबीएसई पोर्टलवर अपलोड करावेत अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

CBSE ने एक गोष्ट लक्षात घेतली आहे की मागील दहा वर्षांच्या काळात लहान मुलांत टाइु 2 मधूमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आधी हा आजार फक्त वयस्कर लोकांत आढळून येत होता. परंतु, आता लहान मुलांनाही होत आहे. सीबीएसईने सर्व प्रिंसीपल्सना लिहिलेल्या पत्रात या समस्येचा उल्लेख केला आहे. ही परिस्थिती साखरेच्या अतिप्रमाणती सेवनामुळे निर्माण झाली आहे.

शाळांमध्ये गोड स्नॅक्स, पेय पदार्थ, प्रोसेस फूड अगदी सहज मिळत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे या पत्रात म्हटले आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 4 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी रोजच्या आहारात साखरेचे प्रमाण 13 टक्के आहे. 11 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 15 टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा हा आकडा जास्त आहे.

भारतात कॅन्सरपेक्षाही लठ्ठपणा धोकादायक; पण, जगासाठी ‘या’ आजाराची डोकेदुखी, अहवाल उघड

follow us