P. Chidambaram On Mumbai Terror Attack : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 26/11 वर एक मोठा खुलासा केल्याने पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत तत्कालीन यूपीए सरकारवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव होता असा खुलासा एका मुलाखतीमध्ये बोलताना पी. चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम यांच्या या दाव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेमुळे, पाकिस्तानविरुद्ध सूडाची कारवाई करण्यात आली नव्हती असं देखील चिदंबरम यांनी म्हटले आहे.
या मुलाखतीमध्ये बोलताना चिदंबरम (P. Chidambaram) म्हणाले की, “ज्या दिवशी दहशतवादी मारले गेले त्या दिवशी मी गृहमंत्री झालो. 30 नोव्हेंबर रोजी शेवटचा दहशतवादी मारला गेला. मला वाटते की तो रविवारचा दिवस होता. जेव्हा पंतप्रधानांनी मला फोन केला होता आणि सांगितले होते की माझ्याकडे गृह खाते देण्यात येत आहे. मात्र मी यासाठी तयार नव्हतो. मात्र त्यांनी पंतप्रधानांनी सांगितले की आम्ही आधीच निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानविरुद्ध कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न या मुलाखतीमध्ये पी. चिदंबरम यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, मला सुरक्षा दलांच्या तयारीची माहिती नव्हती. मला गुप्तचर संस्थांच्या तयारीची माहिती नव्हती. गुप्तचर संस्थांनी पाकिस्तान आणि परिसरात किती संसाधने निर्माण केली आहेत याची मला माहिती नव्हती. त्या क्षणी, मला बदला घेण्याची तीव्र इच्छा वाटली. मी पंतप्रधान आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली परंतु परराष्ट्र मंत्रालय (एमईए) आणि आयएफएस यांच्या प्रभावाखाली निष्कर्ष असा होता की आपण परिस्थितीवर थेट प्रतिक्रिया देऊ नये आणि त्याऐवजी राजनैतिक दृष्टिकोन स्वीकारावा, असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला. 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 175 जणांना ठार मारले होते.
तर दुसरीकडे या मुलाखतीनंतर आता भाजप काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहे. माजी गृहमंत्र्यांनी 17 वर्षांनंतर जे कबूल केले आहे ते देशाला आधीच माहित होते. 26/11 चे हल्ले परकीय शक्तींच्या दबावामुळे योग्यरित्या हाताळले गेले नाहीत. आता खूप उशीर झाला आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.
मोठी बातमी, सभा होणार, खासदार ओवैसींच्या अहिल्यानगरमधील सभेला परवानगी