Download App

“बेजबाबदार अन् बिनबुडाच्या आरोपांकडे दुर्लक्ष, रोज धमक्या येत असताना..”, आयोगाचं राहुल गांधींना सडेतोड उत्तर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

Election Commission replies Rahul Gandhi Allegations : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी (Rahul Gandhi) होत असल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगाला (Election Commission of India) टार्गेट करत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Elections) त्यांनी आयोगाच्या कामकाजावर गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा त्यांनी मतांची चोरी होत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांचे आरोप बेजबाबदार आणि बिनबुडाचे आहेत. त्यामु्ळे आम्ही या आरोपांकडे लक्ष देत नाही. अशा वक्तव्यांकडे लक्ष न देता निष्पक्षपणे कामकाज सुरू ठेवा अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे निवडणूक आयोगाने ट्विट करत सांगितले. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रोजच होत असलेल्या अशा बेजबाबदार आणि बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करतो.

“चंद्रकांतदादा पुणेकर वाटलेच नाहीत, देवेंद्रजी लक्ष घाला”, अजितदादांचा टोला अन् फडणवीसांचीही गुगली

रोज दिल्या जात असलेल्या धमक्यांचा विचार न करता निष्पक्षपाती आणि पारदर्शकपणे कामकाज करा अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा आणि लोकतांत्रिक प्रक्रियेचा आब राखा असेही कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे आयोगाने (Election Commission of India) स्पष्ट केले.

राहुल गांधींचा आरोप काय?

खरंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. आमच्याकडे पुरावे आहेत. या मतचोरीत आयोगाचाही सहभाग आहे. मी अगदी पुराव्यानिशी बोलतोय. ज्यावेळी आम्ही हे पुरावे बाहेर काढू त्याचवेळी निवडणूक आयोग मतचोरी करत आहे, कुणासाठी करत आहे हे देशाला समजेल. आयोग भाजपसाठीच सर्वकाही करत आहे. यावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही असे राहुल गांधी म्हणाले होते.

उपराष्ट्रपतिपदासाठी 9 डिसेंबरला होणार निवडणूक, कोण घेणार जगदीप धनखड यांची जागा?

मध्य प्रदेश आणि लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा संशय आम्हाला होता. महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर हा संशय अधिक बळावला. महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार जोडण्यात आले. परंतु ज्यावेळी मतदार यादी आणि व्हिडिओग्राफीची मागणी काँग्रेसने केली त्यावर आयोगाने कोणतेही सहकार्य केले नाही. निवडणूक आयोगाने मतदार यादी देखील दाखवली नाही. आम्ही व्हिडिओग्राफी मागितली तर त्यांनी या संदर्भातला कायदाच बदलून टाकला असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

 

follow us