सासऱ्याच्या हत्येनंतर ढसाढसा रडणारी सून मास्टरमाईंड?; कानपूर हत्याकांडाची Inside स्टोरी

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case कानपूरमधील प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे.

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case : कोट्यवधींची संपत्ती, घरात बसवलेले CCTV, पैशांच्या खर्चावर नियंत्रण आणि खासगी आयुष्यातील कथित हस्तक्षेप… या सगळ्यामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक तणावाने एका हत्येचे कथित षडयंत्र रचले गेले आणि त्याचा संशय थेट घरातील सुनेकडे पोहोचला. कानपूरमधील औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (वय 63) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची 30 वर्षीय सून शालू मिनोचा हिला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, शालूने कथितपणे 6 लाख रुपयांची सुपारी देऊन सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.

चर्चा तर होणारचं! कर्मचाऱ्यांना 5-10 टक्के अन् पंतप्रधानांना थेट 64 टक्के पगारवाढ….

5 सप्टेंबरच्या रात्री विनीत मिनोचा यांची त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर 26 हून अधिक चाकूचे वार झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सुरुवातीला घरात घुसून झालेली हत्या किंवा लुटीच्या उद्देशाने केलेला हल्ला असावा, असा संशय होता. मात्र, CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, जुन्या नोकराचा संबंध आणि डुप्लिकेट चावी यामुळे तपासाची दिशा हळूहळू बदलत गेली.

पार्टीसाठी कुटुंब बाहेर, हल्लेखोर घरात लपून बसले

पोलिसांच्या तपासानुसार, हत्येच्या रात्री विनीत यांचा मुलगा सुब्रत, सून शालू आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा रात्री सुमारे 9.36 वाजता पार्टीसाठी घराबाहेर पडले. कुटुंब बाहेर गेल्यानंतर काही मिनिटांतच दोन संशयित व्यक्ती फ्लॅटकडे जाताना CCTV कॅमेऱ्यात दिसल्या. पोलिसांचा आरोप आहे की, हे दोघे फ्लॅटमध्ये दाखल झाले आणि विनीत घरी परतण्याची वाट पाहत आत लपून बसले. सुमारे सव्वा तासानंतर रात्री 10.58 वाजता विनीत घरी परतले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.

झोपेत हत्या करण्याचा कथित प्लॅन; पण सगळं बिघडलं

पोलिसांच्या माहितीनुसार, विनीत यांची हत्या झोपेत करण्याचा कथित कट होता. त्यांना उशीने दाबून मारायचे आणि हा प्रकार नैसर्गिक मृत्यू किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारखा भासवायचा, अशी योजना असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, विनीत अचानक मुलाच्या खोलीच्या दिशेने गेल्याने परिस्थिती बदलली. तेथे लपून बसलेले आरोपी त्यांच्या समोर आले आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.

ट्रॅफिक नियम मोडल्यास पॉईंट कट; मर्यादा ओलांडताच लायसन्स रद्द, गडकरींची मोठी घोषणा

CCTV ने उघडला हत्येचा पहिला धागा

हत्येनंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यामध्ये दिसलेल्या दोन संशयितांपैकी एकाची ओळख विशाल गौतम म्हणून झाली. विशाल यापूर्वी विनीत यांच्या घरात काम करत होता. सुमारे सहा वर्षांपूर्वी चोरीच्या आरोपावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र, घरातील व्यवस्था, कुटुंबाची दिनचर्या आणि फ्लॅटमध्ये ये-जा करण्याच्या पद्धतीची त्याला माहिती होती, असा पोलिसांचा दावा आहे. याच जुन्या ओळखीचा कथितपणे हत्येच्या कटासाठी वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

डुप्लिकेट चावीने घरात प्रवेश?

तपासातील आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे फ्लॅटची डुप्लिकेट चावी. पोलिसांच्या मते, विशालकडे घराची डुप्लिकेट चावी होती आणि त्याच चावीच्या मदतीने तो साथीदार राजकिशोरसोबत फ्लॅटमध्ये शिरला. यामुळे हल्लेखोर अचानक घरात घुसले नव्हते, तर आधीपासून नियोजन करून ते घरात पोहोचले होते, असा पोलिसांचा संशय बळावला.

6 लाखांची कथित सुपारी

तपासात हत्येसाठी कथितपणे 6 लाख रुपयांची सुपारी ठरल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यापैकी 2 लाख रुपये हत्या झाल्यानंतर आणि उर्वरित 4 लाख रुपये सुमारे 15 दिवसांनी देण्याचे ठरल्याची माहिती समोर आली आहे. घरातून मोठ्या प्रमाणावर रोकड किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या नसल्याने पोलिसांनी सुरुवातीपासूनच लुटीच्या शक्यतेबरोबर इतर कारणांचाही तपास केला.

पैशांवर नियंत्रण आणि घरातील CCTV ठरले महत्त्वाचे

पोलिसांच्या तपासात विनीत आणि त्यांच्या मुलगा-सुनेमध्ये पैशांवरून आणि घरातील नियंत्रणावरून तणाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. विनीत कुटुंबाच्या खर्चावर नियंत्रण ठेवत होते. मुलगा आणि सुनेलाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ठराविक स्वरूपात पैसे दिले जात असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर घरातील अनेक भागांमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. शालूला आपल्या खासगी आयुष्यात सतत हस्तक्षेप केला जात असल्याची नाराजी होती आणि पैशांवरही बंधने असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच कथित कौटुंबिक आणि आर्थिक तणावातून हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शालूवर ठेवण्यात आला आहे.

21 दिवसांत 330 कॉल्स; विशालसोबत नेमकं काय सुरू होतं?

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा डिजिटल पुरावा म्हणजे मोबाईल कॉल रेकॉर्ड. पोलिसांच्या तपासानुसार, 21 दिवसांत शालू आणि माजी नोकर विशाल यांच्यात तब्बल 330 वेळा संपर्क झाला. याशिवाय 29 ऑगस्टपासून हत्येच्या रात्रीपर्यंत विशाल आणि सुब्रत यांच्यात 25 वेळा, तर विशाल आणि शालू यांच्यात 14 वेळा संभाषण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. म्हणजे हत्येच्या आधीच्या काही दिवसांतच विशालचा या कुटुंबाशी वारंवार संपर्क होता. इतकेच नव्हे, तर हत्येच्या वेळीही शालू आणि विशाल यांच्यात WhatsApp वर तीन वेळा संपर्क झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला.

सुब्रतच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

या हत्याकांडात शालूची भूमिका समोर आल्यानंतर आता तिचा पती आणि मृत विनीत यांचा मुलगा सुब्रत याच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विशाल आणि सुब्रत यांच्यात हत्येपूर्वी अनेक वेळा संपर्क झाला होता. CCTV फुटेज दाखवल्यानंतरही सुब्रतने विशालला ओळखण्यास नकार दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे सुब्रतला या कटाची माहिती होती का? त्याची यात काही भूमिका होती का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

गार्डला फोन, एंट्री नोंदवू न देण्याचाही संशय

हत्येच्या आधी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाला फोन करण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली आहे. एका व्यक्तीला मित्रासोबत येण्याची माहिती देऊन त्याला आत सोडण्यास आणि रजिस्टरमध्ये नोंद न करण्यास सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. CCTV फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या मदतीने या कनेक्शनची पडताळणी केली जात आहे.

सासऱ्याच्या मृत्यूनंतर रडणारी सूनच पोलिसांच्या रडारवर

विनीत यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि सून घरी परतले. घरातील दृश्य पाहून कुटुंबात एकच आक्रोश झाला. त्यावेळी शालू सासऱ्याच्या मृत्यूने ढसाढसा रडताना दिसली. मात्र, पोलिसांनी तपास केवळ घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांपुरता मर्यादित ठेवला नाही. CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींची हालचाल, डुप्लिकेट चावी आणि हत्येची संपूर्ण टाइमलाइन यांची सांगड घातल्यानंतर तपासाची दिशा घरातील व्यक्तींकडे वळली. यानंतर शालूच्या कथित भूमिकेचा धागा पोलिसांना मिळाला आणि तिला अटक करण्यात आली. या प्रकरणात सध्या शालू, माजी नोकर विशाल आणि त्याचा साथीदार राजकिशोर हे तीन प्रमुख संशयित/आरोपी पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

पोलिसांचा दावा आहे की, या तिघांमधील कथित संपर्क, CCTV फुटेज, डुप्लिकेट चावी आणि पैशांच्या व्यवहाराच्या धाग्यांमधून हत्येचे कथित षडयंत्र उघड झाले. मात्र, पोलिसांच्या आरोपांवरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. या प्रकरणातील आरोप आणि संबंधित पुराव्यांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होईल. कानपूरच्या या हत्याकांडातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तपासाची बदललेली दिशा, बाहेरून झालेल्या हल्ल्यापासून सुरू झालेला तपास घरातील कथित कौटुंबिक तणाव, पैशांवरील नियंत्रण, CCTV आणि शेकडो फोन कॉल्सपर्यंत पोहोचला. आता या संपूर्ण कटामागे नेमका कोणाचा किती सहभाग होता, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version