Cockroach Janata Party Protest delhi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडतायत. एकीकडे नीट पेपर लीक (NEET Paper leak) आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party )’चलो संसद’ म्हणत मोर्चा काढला. विरोधकांनी NEET पेपरफुटी आणि राम मंदिरातील दान घोटाळा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले आहे. संसदेबाहेर कॉकरोज जनता पार्टीने, तर सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरलंय. सोमवारी दिल्लीत काय-काय घडलंय ते पाहुया…
संसद भवन परिसरात प्रचंड गोंधळ
नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, बेरोजगारीसह अनेक मागण्यांवर जंतर-मंतरवर गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे जंतर-मंतरवर आंदोलक चिडले होते. त्यानंतर सोमवारी थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाकडे आगेकूच केली. पण दिल्ली पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आंदोलनकांना रोखले. गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. आंदोलक अभिजित दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने केला होता. परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. संसद भवन, इंडिया गेट, केंद्रीय सचिवालय, जंतरमंतर आणि इतर संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची तातडीची बैठक
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीय. या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा झाली. आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. सरकारवर दबाव आल्याने प्रधान यांचा राजीनामा घेतला जाऊ शकते.
CJP चे शिष्टमंडळ जे. पी. नड्डांच्या भेटीला
संसदेवरील मोर्चावरून केंद्र सरकारने आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखवली. CJP चे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीला गेले. NEET पेपर लीकप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची, परीक्षा पद्धतीत सुधारणांची प्रमुख मागणी घेऊन हे शिष्टमंडळ नड्डा यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. परंतु तीन मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही.
विरोधकांचा सभागृहात गदारोळ
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक आक्रमक झाले. नीट पेपरफुटी प्रकरण आणि अयोध्येतील राम मंदिरातील दानपेट्यांमधील कथित चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या दोन्ही विषयांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले.
