Download App

बिहारी राजकारणात ट्विस्ट! नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची घोषणा

आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.

Prashant Kishor Political Party : आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने (Prashant Kishor) आता राजकीय रुप घेतलं आहे. आज बुधवारी जनसुराज राजकीय पक्षात रुपांतरीत झाले. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी या निर्णयाची घोषणा केली. बिहारच्या राजकारणातली आजची ही मोठी घडामोड ठरली. बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीने राजकीय पिक्चर नक्कीच बदलणार आहे. पुढील वर्षात बिहार विधानसभेच्या निवडणुका (Bihar Assembly Elections) होणार आहेत. या निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. त्यात आता जनसुराज पक्षाची (Jan Suraj Party) भर पडली आहे.

शिवदीप लांडेंची आता नेतेगिरी?, प्रशांत किशोर यांच्या पक्षातून राजकीय एन्ट्रीची चर्चा

आज बिहारची राजधानी पटना शहरात (Patna City) एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी आपला राजकीय पक्ष लाँच केला. या पक्षाचं नाव जनसुराज असंच राहणार आहे. या नव्या पक्षाचे पहिले प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून मनोज भारती यांची नियुक्ती प्रशांत किशोर यांनी केली. प्रशांत किशोर म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून जनसुराज अभियान सुरू आहे. मागील दोन ते अडीच वर्षांपासून देशात हे अभियान नियमितपणे सुरू आहे. लोक विचारत होते की तुम्ही तुमचा राजकीय पक्ष कधी काढणार. आज तुम्ही सर्व लोक येथे जमले आहात. आज निवडणूक आयोगानेही (Election Commission) जनसुराजला जनसुराज पार्टी नावाने मान्यता दिली आहे.

यानंतर प्रशांत किशोर यांनी उपस्थित समर्थकांना विचारलं पक्षाचं नाव तर ठीक आहे ना. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून काही होणार नाही. जर तुम्ही नको म्हणत असाल तर आपण निवडणूक आयोगाकडे पुन्हा अर्ज करू. जनसुराज पार्टी नाव ठीक आहे. सर्वांनी शिक्कामोर्तबही केलंय. या नव्या राजकीय पक्षाची सुरुवात पटना शहरातील वेटरनरी कॉलेजच्या मैदानातून करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, पवन वर्मा, माजी खासदार मोनाजिर हसन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

प्रशांत किशोर यांनी दोन वर्षांपूर्वी चंपारण येथून तीन हजार किलोमीटरची पदयात्रा सुरू केली होती. त्यानंतर आज दोन वर्षांनी त्यांनी पक्ष स्थापन करून खऱ्या अर्थाने राजकारणात उडी घेतली. पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्या संबंधित कामकाजाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यासाठी अधिकृत संचालन समितीत 25 सदस्य असतील. या घोषणेबरोबरच संविधान समितीही घोषित होण्याची शक्यता आहे. या समितीकडून जनसुराज पक्षाची घटना तयार करण्यात येईल.

 

follow us