एका कथित लाल डायरीच्या आरोपांनी राजस्थानच्या राजकारणात सध्या वादळ आणलं आहे. राजस्थानच्या विधानसभेपासून ते दिल्लीपर्यंत या ‘लाल डायरी’ प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मागच्या 4 वर्षांमध्ये गेहलोत सरकारविरोधात कोणताही मोठा आणि ठोस मुद्दा मिळाला नव्हता. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रुपाने भाजपच्या हातात आयत कोलित मिळालं आहे. (Story of Lal diary Rajasthan congress vs bjp Ashok Gehlot vs pm Narendra Modi)
राज्यात भाजपने वातावरण तापवलं असतानाच सीकर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल डायरीच्या प्रकरणावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. लाल डायरीचे नाव ऐकताच काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अवस्था वाईट झाली असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस सरकारची काळी कृत्ये या डायरीत बंद आहेत. ही लाल डायरी काँग्रेस सरकारचं बस्तान उद्ध्वस्त करणारी आहे, असा दावाही त्यांनी सीकरच्या सभेत केला. त्याचवेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र लाल डायरीवर पूर्णपणे मौन पाळले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांना लाल डायरीऐवजी लाल टोमॅटोवर बोलण्याचं आव्हान दिलं.
राजस्थानच्या गेहलोत सरकारमधून बरखास्त केल्यानंतर राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीच्या वादाला सुरुवात केली. मणिपूरच्या घटनेवर काँग्रेस देशभरात भाजपला घेरण्याचं काम करत होती. त्याच दरम्यान 21 जुलैला राजेंद्र गुडा यांनी विधानसभेत आपल्याच काँग्रेस सरकारवर निशाणा साधताना म्हटले होते की, “राजस्थानमध्ये ज्याप्रकारे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशावेळी मणिपूरबद्दल बोलण्याऐवजी आपण आपल्या राज्यात लक्ष घालायला हवे. ही संधी पाहून भाजपने आक्रमक होत गुढा यांच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला. या वक्तव्यानंतर अवघ्या तीन तासातच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या शिफारशीवरून त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यात आलं.
बडतर्फ केल्यानंतर राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीचा वाद पेटवून दिला. बडतर्फ झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी म्हणजे 24 जुलैला ते लाल रंगाची डायरी घेऊन विधानसभेत आले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर डायरी काढली. पण विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी त्यांना ती डायरी सभागृहात सादर करु देण्यास नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरु केला. प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत गेलं आणि अध्यक्षांच्या सांगण्यावरून मार्शलनी राजेंद्र गुढा यांना सभागृहातून बाहेर काढलं.
विधानसभेतून बाहेर काढल्यानंतर राजेंद्र गुढा माध्यमांसमोर आले. गुढा यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस नेते आणि आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र राठोड यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा अशोक गेहलोत यांनी त्यांना लाल डायरी घेण्यासाठी पाठवले होते. गुढा यांच्या म्हणण्यानुसार, गेहलोत यांनी डायरी जाळण्याचे आदेशही दिले होते. मात्र त्यांनी ती स्वतःजवळ ठेवली. यानंतर विधानसभेत गेहलोत यांच्या सांगण्यावरून लाल डायरी हिसकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे आमदार रफिक खान यांनी त्यांच्याकडून डायरी हिसकावून घेतली आणि त्यांना विधानसभेत मारहाण केली. राजेंद्र गुढा यांनी गेहलोत आणि त्यांच्या सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
‘लाल डायरीत काय होते’ या प्रश्नावर उत्तर देताना गुढा म्हणाले – राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आमदारांचा घोडेबाजार झाला होता. त्याचा संपूर्ण हिशोब त्या डायरीत आहे. याशिवाय राजेंद्र गुडा यांनी राज्याच्या क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंबंधीची अनेक गुपिते डायरीत असल्याचा दावा केला. अशोक गेहलोत यांचे सुपुत्र वैभव गेहलोत हे राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या संपूर्ण वक्तव्यावर धर्मेंद्र राठोड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राठोड म्हणाले की, छाप्याच्या वेळी गुढा माझ्या घरी नक्कीच आले होते, पण डायरीचा काहीच विषय नव्हता. त्यांनी कसलीही डायरी नेली नव्हती. गुढा हे प्रचंड अविश्वासू व्यक्तीमत्व आहे, असंही राठोड म्हणाले. आता ते किती विश्वासू, अविश्वासू आहेत हे येत्या काळात पोलीस तपासात किंवा तपाय यंत्रणेच्या तपासानंतर समोर येईलच. मात्र या लाल डायरीमुळे राजस्थानच्या राजकारणात वादळ आलं हेही तितकचं खरं आहे.