Styapal Malik Allegations On PM Modi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले आहे. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, देशभरात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवरून किंवा विरोधकांच्या एखाद्या कृतीवरून भाजपचे नेते आक्रमक होत अक्षरक्षः रान उठवताना आपण पाहिले आहे. मात्र, पुलवामा सारख्या घटनेवर माजी राज्यपाल थेट गंभीर खुलासे करतात. या घटनेला चोवीस तास उलटून जातात मात्र, त्यानंतरदेखील भाजपचा देशभरातील एकही नेता या मुद्द्यावरून एक चकार शब्ददेखील काढत नाही किंवा त्यावर प्रतिक्रियाही देत नाही. यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गंभीर आरोपांनंतरही भाजप चुडीचुप्प का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भाजपच्या या गप्प राहण्यामुळे मलिक यांनी केलेले दावे खरे आहेत का? हा मुद्दादेखील यामुळे उपस्थित केला जात आहे.
सत्यपाल मलिकांचे दावे काय?
मलिकांनी दिलेल्या मुलाखतीत मलिकांनी “पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केली होती. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मौन बाळगण्यास सांगितले होते.” असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे.बिहार, जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय अशा राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल पदावर असताना केंद्र सरकारवर टीका केली होती.
पुलवामा हल्ला गृह मंत्रालयाची चूक
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला ही केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी चूक होती, असा खळबळजनक दावाही मलिक यांनी केला. या हल्ल्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. या घटनेत सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ला हा विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या अक्षमतेचा आणि निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप माजी राज्यपालांनी केला.
पुलवामा हल्ल्याच्या वेळी राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री होते. सीआरपीएफने आपल्या जवानांसाठी विमान मागितले होते, परंतु गृह मंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर सीआरपीएफने ज्या रस्त्यावरून जवानांना पाठवले त्याचा तपास केला नाही. या हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.