केरळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. पंतप्रधान मोदींसह 72 जणांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. पण या सोहळ्याला 24 तास पार पडण्यापूर्वीच एका मंत्र्यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. सुरेश गोपी (Suresh Gopi) असे या मंत्र्यांचे नाव आहे. दिल्लीतील शपथविधी समारंभानंतर एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Suresh Gopi has expressed his desire to resign after the swearing-in ceremony.)
सुरेश गोपी म्हणाले, मी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. मी म्हणालोही की मला या पदाची गरज नाही. खासदार म्हणून काम करण्याचे माझे ध्येय आहे. त्यामुळे लवकरच या पदावरून मला मुक्त केले जाईल अशी आशा आहे. त्रिशूरच्या मतदारांना याबाबत कोणतीही अडचण नाही. खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगले काम करेन, हे त्यांना माहित आहे. खरंतर मी काही चित्रपट साइन केले आहेत. ते मला कोणत्याही किंमतीत करायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सुरेश गोपी यांनी केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरेश यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांचा 74 हजार 686 मतांनी पराभव केला. ते केरळमधील भाजपचे पहिले खासदार म्हणून ओळखले जातात. गतवेळी इथून काँग्रेसचा विजय झाला होता. सुरेश गोपी लोकसभा खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राज्यसभेचे खासदारही होते. 2016 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2022 पर्यंत होता.
सुरेश गोपी मूळचे केरळमधील अलाप्पुझा येथील आहेत. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. त्यांनी कोल्लममधून विज्ञान शाखेत पदवी घेतली असून इंग्रजीमध्ये मास्टर्स केले आहे. सुरेश गोपी हे अभिनेतेही आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकाही साकारल्या आहेत. 1998 च्या कालियाट्टम चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ते बराच काळ टीव्ही शो होस्ट करत आहे.