किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) डोडा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुमारे 300 फूट दरीत कोसळली. यात तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची तर 19 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी बस किश्तवाडहून जम्मूच्या दिशेने जात होती. त्यावेळी दुपारी 12 च्या सुमारास डोडा जिल्ह्यातील बग्गर भागातील त्रांगल येथे बसचे नियंत्रण सुटले आणि सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळली. (terrible accident in Jammu While overtaking, the bus plunged into a 300-foot ravine; 36 people died)
अपघाताची घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच पोलिसांनाही कळविण्यात आले. प्रशासनाने उपस्थित लोकांना हाताशी धरत तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी जीएमसी दोडा येथे नेण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यांमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक पाहून त्यांना जीएमसी जम्मू येथे रेफर करण्यात आले होते, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बस नोंदणी क्रमांक JK02CN-6555 या बसमध्ये 56 जण प्रवास करत होते. ही बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. बटोट-किश्तवार राष्ट्रीय महामार्गावर त्रंगल-असरजवळ बसचे नियंत्रण सुटले आणि ती 300 फूट दरीत कोसळली. या मार्गावर तीन बस एकत्र धावत होत्या, त्यावेळी एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या शर्यतीत हा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
The bus accident in Doda, Jammu and Kashmir is distressing. My condolences to the families who have lost their near and dear ones. I pray that the injured recover at the earliest.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. Rs.…
— PMO India (@PMOIndia) November 15, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे झालेला बस अपघात दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. याशिवाय त्यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून देण्याची घोषणाही केली.