मॉरिशसच्या लाँग माउंटन परिसरातील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मबीर गोकुळ यांच्या हस्ते हिंदी प्रसारणी सभेच्या आवारात हा भव्य सोहळा पार पडला. याच वेळी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्ये देखील लोकमान्यांच्या आणखी एका अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
हिंदी प्रसारणी सभेच्या अध्यक्षा रोहिणी रामरूप यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला मॉरिशसचे शिक्षण मंत्री डॉ. महेंद्र गुणप्रसाद, आरोग्य व कल्याण मंत्री अनिल कुमार बाचू, सांस्कृतिक मंत्री महेंद्र गुंडिया, भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव, दिलीप ठाणेकर तसेच टिळक कुटुंबियातील शैलेश टिळक, अंजली राहळकर, कुणाल टिळक आणि श्रुतिका कुणाल टिळक यांच्यासह हिंदी प्रसारणी सभा व महाराष्ट्र मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती धर्मबीर गोकूल यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांचा गौरव करताना, “हा कार्यक्रम भारत आणि मॉरिशस यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक नात्याचा जिवंत पूल आहे. मॉरिशसमध्ये हिंदी भाषेचे शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचे जतन हे भारतीय वंशीय समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. लोकमान्य टिळकांचा वारसा आजही प्रेरणादायी आहे. हा सोहळा भारत आणि मॉरिशस यांच्यातील दृढ संबंधांचे तसेच लोकमान्यांच्या अमर विचारांचे प्रतीक आहे.
सोलापूरच्या तांदूळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत
महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील भागीदारी अधिक बळकट होत असून या उपक्रमामुळे दोन्ही समाजांतील सांस्कृतिक नाते आणखी दृढ होईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांचे विशेष आभार मानले. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा प्रभाव मॉरिशसमधील भारतीय ऊस कामगारांवर मोठ्या प्रमाणात पडला होता. त्यांच्यावरील आदर आणि कृतज्ञतेपोटी 1926 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या हिंदी विद्यालयाला लोकमान्य टिळक यांचे नाव देण्यात आले.
या ऐतिहासिक संस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासानिमित्त लोकमान्य टिळक विचार मंच आणि शैलेश टिळक यांच्या वतीने विशेष प्रतिमाही भेट देण्यात आल्या. या प्रतिमा पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांचे पुत्र विपुल खटावकर यांनी साकारल्या आहेत. लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त झालेला हा सोहळा केवळ एका अर्धपुतळ्याच्या अनावरणापुरता मर्यादित न राहता भारत आणि मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक नात्याला उजाळा देणारा संस्मरणीय क्षण ठरला.
