Amol Mitkari Big Statment : येत्या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. पुढील वर्षभरात पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री म्हणून पंढरीत येतील, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.
आज्जी निघाली शाळेला! ‘म’ मोबाईलचा सोडून ‘म’ मराठीचा…
आमदार अमोल मिटकरी आज पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना मिळावा, असं साकडं आपण पांडुरंगाला घातलं, असं मिटकरींनी सांगितलं. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले की, राज्याच्या राजकारणात असा कोणता चमत्कार होणार की, मुख्यमंत्री म्हणून अजित पवार विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील ? त्यावर त्यांनी थेट पांडुरंगाच्या मर्जीनं राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील, असं सांगितलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ‘DGCA’चा मोठा निर्णय; ‘या’ ३ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश
मिटकरी पुढं म्हणाले की, मी अजित पवारांचा एक भक्त आहे. माझ्या नेत्याने मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, असं मला वाटले. त्यामुळं मी आज देवाला त्याचे साकडे घातले. असे साकडे अनेकजण घालतात. काहीजण पाऊस, पाणी मुबलक पडू दे, शेती चांगली पिक दे, असं साकडं घालतात. त्याचप्रमाणे मी माझ्या नेत्यासाठी परमेश्वराला साकडे घातले, असं मिटकरी म्हणाले.
विशेष म्हणजे अजित पवार यांनीही आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपवून
ठेवली नाही. त्यांनी वेळोवेळी आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले होते की, आपल्या सर्वांनाच तसं वाटत असतं. पण, शेवटी योग जुळून यावा लागतो. मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठं जमंतय, योग आला नाही, असं ते म्हणाले होते.