विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्र सरकारवर अण्णामलाईंची टीका; विद्यार्थ्यांचा विश्वास गमावणे देशासाठी धोकादायक

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास झालेला विलंब, परीक्षेच्या प्रक्रियेतील त्रुटींवर अण्णामलाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Untitled Design (78)

Untitled Design (78)

Annamalai criticizes the Central Government : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केंद्र सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास झालेला विलंब, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेतील त्रुटींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनाही त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला. अलीकडेच भाजपपासून वेगळी भूमिका घेत स्वतःची राजकीय मोहीम सुरू केलेल्या अण्णामलाई यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून ते नीट परीक्षेचे समर्थन करत आले आहेत.

त्यांच्या मते, या परीक्षेमुळे देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत एकसमानता आली आणि ग्रामीण तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही डॉक्टर होण्याची समान संधी मिळाली. मात्र, गेल्या काही वर्षांत नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे अण्णामलाई यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत नीट यूजी परीक्षेचा प्रश्नपत्रिका गळतीचा प्रकार तीन वेळा समोर आला. यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला. अनेकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, तर पारदर्शकतेसाठी उभारण्यात आलेली व्यवस्था स्वतःच अपयशी ठरत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

Narendra Modi : पेपर लीक प्रकरणात ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय स्थापन करणार; PM मोदींची मोठी घोषणा

विद्यार्थी रस्त्यावर का उतरले, याचे मूळ कारण याच घटनांमध्ये आहे. जेव्हा परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात येते आणि जबाबदारांवर कोणतीही कारवाई होत नाही, तेव्हा विद्यार्थ्यांचा संताप वाढणे स्वाभाविक आहे, असे अण्णामलाई म्हणाले. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारने त्यांच्याशी तातडीने संवाद का साधला नाही? परिस्थिती चिघळेपर्यंत आणि आंदोलन उग्र होईपर्यंत सरकारने प्रतीक्षा का केली? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लवकर आणि सकारात्मक चर्चा होणे आवश्यक होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याचवेळी त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनाही सावध राहण्याचा इशारा दिला. अण्णामलाई म्हणाले, कोणतेही आंदोलन दीर्घकाळ चालले की विविध स्वार्थी घटक त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीच्या मागण्यांशी संबंध नसलेल्या मुद्द्यांना पुढे आणले जाते किंवा आंदोलनाचा वापर वैयक्तिक राजकीय हेतूंसाठी केला जातो. अशा परिस्थितीत नेतृत्वाने सतर्क राहून आंदोलनाचा मूळ उद्देश कायम ठेवणे आवश्यक आहे.

Maharashtra Rain Alert : पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

केंद्र सरकारला आवाहन करताना अण्णामलाई यांनी पारदर्शकता आणि संवाद यावर भर दिला. सरकारने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तातडीने योग्य पावले उचलावीत. देशाची खरी ताकद ही तरुणांच्या विश्वासात असते. जर विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, तर तो देशाच्या भविष्यासाठी गंभीर इशारा ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे आणि शिक्षण व्यवस्थेची निष्पक्षता जपणे ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचेही अण्णामलाई यांनी यावेळी अधोरेखित केले.

Exit mobile version