Download App

कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये झालेल्या बलात्कारांवरही बोला; चित्रा वाघ यांचे मविआ नेत्यांना आव्हान

कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले होते, 2020 मध्ये हिंगणघाट जळीत हत्याकांड झालं, त्यावरही बोला, चित्रा वाघ यांची मविआवर टीका

  • Written By: Last Updated:

Chitra Wagh : बदलापूरच्या (Badlapur) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेर्धात आज (24 ऑगस्ट) रोजी महाविकास आघाडीकडून (MVA) तोंडाला पट्ट्या लावून सरकार विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला विरोध दर्शवण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुंबईत (Mumbai) आंदोलन केले. यावेळी बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली.

भाजपात बंडाची ठिणगी! आमदार राजळेंविरोधात मुंडेंनी थोपटले दंड 

चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडीने बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गुन्ह्यांची आठवण करून देण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी येथे बसलो आहोत. कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले होते, 2020 मध्ये हिंगणघाट जळीत हत्याकांड, तसेच त्यांच्या काळात झालेल्या गुन्ह्यांवरही बोला, असं आव्हान वाघ यांनी केलं.

पुढं त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीचा नारा ‘संस्कृतीविरुद्ध विकृती’ असा आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आम्ही कसे महिलांचे उद्धारकर्ते आहोत, हे सांगताना थकत नाहीत. पण त्यांच्याच पक्षातील एक नेता एका महिला पत्रकाराशी ज्या हीन पातळीने बोलत तेव्हा नक्कीच त्यांचे त्याला समर्थन असणार. मग किमान हा संस्कृतीचा, स्त्रीमुक्तीचा बुरखा तरी कशाला हवा? तुमच्या मनांमध्ये महिलांबद्दल जो काही आदरभाव, सत्कार, सन्मान आहे तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने दाखवून दिला आहे, अशी टीका वाघ यांनी केली.

प्रस्थापितांना घाम फुटणारचं! आमदारीकीसाठी 800 इच्छूकांची जरांगेकडे धाव….

चित्रा वाघ म्हणाल्या, हे जे विकृत हमामखोर आपल्या समाजात दिसत आहेत, या विकृत हरामखोरांना ठेचायचे काम सरकार म्हणून तर सरकारचे आहेच, पण आपले देखील आहे. सरकार आपले काम व्यवस्थित करत आहे. मात्र विरोधक त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असं वाघ म्हणाल्या.

महाराष्ट्र बंद राजकीय हेतूने प्रेरित होता
त्या म्हणाल्या, न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्या महाराष्ट्र बंदला न्यायालयाने मान्यता दिली नाही. महाराष्ट्र बंद हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता. यांना जनतेच्या सुख-दु:खाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त महाराष्ट्र बदनाम करायचा आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करायची आहे, त्यांना एकनाथ शिंदे यांची बदनामी करायची आहे. महाराष्ट्राला अशांत करण्याचं विरोधकांचं षडयंत्र आहे, अशी टीका वाघ यांनी केली.

follow us