Download App

‘मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं, आता शाप अनुभवा’; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

Uddhav Thackeray Criticized PM Narendra Modi : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पु्न्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. त्यांच्या भाषणातील मुद्दे मी इकडे मांडत नाही पण मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही त्यांनी दिला. सामना या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

“उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच CM व्हायचं होतं, त्यांनी..” फडणवीसांचा खळबळजनक दावा

ठाकरे पुढे म्हणाले, दिल्लीतल्या खेचरांना महाराष्ट्रातल्या पाण्यात फक्त पवार आणि ठाकरेच दिसत आहेत. या खेचरांना आता आम्ही कायमचे पाणी पाजू. महाराष्ट्राचं प्रेम आतापर्यंत मोदींना मिळालं आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते सुद्धा अनुभवा. गुजरातवर आमचा राग नाही. कारण गुजरात सुद्धा आपलंच आहे. येथे राहणाऱ्या गुजरातील लोकांनीही त्यांच्या मनात अशीच भावना ठेवली पाहिजे. १९९२-९३ चा काळ आठवा. या काळात शिवसेनेच त्यांचं रक्षण केलं होतं. त्यावेळी मोदी कुठे होते, असा सवाल त्यांनी विचारला.

विरोधक सतत असा आरोप करत असतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही औरंगजेबाचे फॅन झाला आहात असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी पाकिस्तानात जाऊन त्यांनी केक खाल्ला होता. आमंत्रण नसतानाच पाकिस्तानात गेले होते ते मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब येथे आला. २७ वर्षे येथेच राहिला. त्याने जर काही रोड शो केले असतील तर मला माहिती नाही. पण तो पुन्हा काही आग्र्याला जाऊ शकला नाही. औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठे आजही आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘PM पदसाठी मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती’ काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

पुलवामात जो हल्ला झाला होता त्याला जबाबदार कोण असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. मोदी सरकारच्या थापा आता उघड झाल्या आहेत. त्यांच्या भाषणातील मुद्दे मी इकडे मांडत बसणार नाही. पण मी या सरकारला गजनी सरकार नक्कीच म्हणेन. कारण २०१४ साली ते काय बोलले हे त्यांना २०१९ मध्ये आठवत नव्हतं. २०१९ मध्ये काय बोलले हे आज त्यांना आठवत नाही. तसेच आज काय बोलतात हे त्यांना उद्या आठवणार नाही. दहा वर्ष त्यांनी जनतेला मुर्ख बनवलं. पुढेही मूर्ख बनवू असं त्यांना वाटतं. पण सदासर्वकाळ तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us