Download App

‘आम्ही संघर्ष केला आणि पुढेही करू, पण त्यासाठी तुमची साथ हवी; राज ठाकरेंचं आवाहन

  • Written By: Last Updated:

मुंबई : मराठी भाषा गौरव दिन आज २७ फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. (marathi bhasha gaurav din) कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. आता मराठी जनांची आपल्या भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा ही मागणी आहे. (Marathi Rajbhasha Din 2023) आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा मराठी बांधवांना साद घातली. मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करु. पण त्याकरिता आमच्या संघर्षाला तुमची साथ द्या, असं आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी बांधवांना केले.

…क्षणाचाही विलंब लागणार नाही

लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देत असताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे, हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जाकरिता आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करु. पण त्याकरिता तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य राहणार आहे. मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या गोष्टी विषयी अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही, असे आवाहन राज ठाकरे यांनी मराठी बांधवांना केले.

‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा…’ राज ठाकरे

राज ठाकरे यांनी सांगितलं आहे की, कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कोणत्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांकरिता, आपल्या संस्कृतीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर कोणताही पक्ष हिरीरीने पुढे आला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यामध्ये कोणी येईल अशी शक्यता देखील वाटत नाही. मी माझ्या विकासाच्या आराखड्यात सांगितलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा… असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us