Download App

“काय सांगता येत भाऊ, उद्या तुम्हीही CM व्हालं” : मोदी-शाहांच्या ‘दे धक्का’ पॅटर्नने निष्ठावंतांच्या आशा पल्लवित

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशभरातील पत्रकारांचे, माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवले. तीन राज्यातील निकालांनंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल विचारला की प्रमुख नावे चर्चेत येत होती. पण घोषणा होताच चर्चेतील नावे गायब व्हायची आणि एक नवीनच नाव फ्रेममध्ये येत होते. याप्रमाणे छत्तीसगडमध्ये विष्णूदेव साय, मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव आणि राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा या निष्ठावंतांच्या गळ्यात अनपेक्षित आणि धक्कादायक पद्धतीने मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. (politics of Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah have created tension among BJP leaders in Maharashtra)

पण मोदी आणि शाहंच्या याच दे धक्का पॅटर्नने महाराष्ट्रातील निष्ठावंतांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. याचाच प्रत्यय नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनात आणि भाजपच्या नागपूरमधील बैठकीत आला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो राजकीय धक्का दिला त्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे तर पदाधिकारी आणि आमदारांमध्ये नवी उमेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअ‍ॅक्शन

“बाबाजी काही करु शकतो” हा दिग्गजांचा आश्चर्याचा सूर नंतर हळूहळू चिंतेत बदलू लागला. प्रत्येक नेता प्रत्येक लोकप्रतिनिधी भेटल्यानंतर याच निर्णयाविषयी चर्चा होऊ लागली. शिंदे गटाचे कसे होईल. अजित पवारांचे काय होईल? भाजपात आता काहीही होऊ शकते इथपासून अनेक शंका , शक्यतांवर चर्चा झाली. पक्ष संघटनेत एवढे वर्ष काम केलेल्या शिवराज सिंह चव्हाण आणि वसुंधरा राजे यांच्याविषयी बहुतांश नेत्यांनी चिंता व्यक्त केली. “आता कोणाच्या हातात काही नाही, बाबाजी सबकुछ है” हे वाक्य अनेकांनी मनात पक्क करुन ठेवले आहे

Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ’

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा स्ट्रेस कमी होण्याच्या दृष्थीने अनेकांनी हा विषय टाळल्याचे ही दिसत होते. पण एकमेकांना भेटल्यावर “भाऊ आपल्यात काहीही होऊ शकतं. उद्या तुम्हीही मुख्यमंत्री व्हाल, काय संगता येतं?. असे म्हणत टाळी देऊन सर्व चिंता हास्यात विरून जात होती. पण पुढे काहीही होऊ शकते या चिंतेने अनेकांच्या चेहऱ्याची रौनक गेली आहे हे मात्र नक्की.

follow us