Download App

Sanjay Raut : ‘समृद्धी’वरील मृत्यू म्हणजे सरकारी हत्या; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात बारा (Road Accident) जणांचा मृत्यू झाला तर 23 जण जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही आज पत्रकार परिषदेत राज्य सरकावर हल्लाबोल केला. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या हत्या होत असून या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर सदोष मनु्ष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?, हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावत आहेत. मग इथं कोण जाणार?, असा सवाल उपस्थित करत संबंधित मंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी

‘समृद्धी’ म्हणजे ठेकेदारांचं हित, कोट्यावधींचा मलिदा

समृद्धी महामार्ग हा मुळात चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेला आहे. हा महामार्ग निर्माण करताना जनतेच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचे हित त्यातून कोट्यवधीचा मलिदा या पलीकडे या समृद्धी महामार्गाकडे पाहिले गेले नाही. समृद्धी महामार्ग बनवत असताना शेतकरी, लहान उद्योजक यांचं हित पहिलं नाही, जमिनी ओरबाडून घेतल्या. फळबागा, रस्त्यावरील उद्योग उद्धवस्त करण्यात आले हा त्यांचाच शाप आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

घाईघाईत हा महामार्ग बनवण्यात आला. भीषण अपघात झाले त्याची जबाबदारी कोणीही घेत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे फक्त श्रेय घ्यायला पुढे होते. या महामार्गामध्ये अजून देखील सुधारणा करून लोकांचे प्राण वाचवता आले असते ते त्यांनी पाहिले पाहिजे. इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठेच दिसत नाही. कुठे थांबा नाही, कुठे लोकांना विश्रांतीची जागा नाही.

संबंधित मंत्र्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

आम्ही मागेच सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. रोज लोकांच्या हत्या होतात. मग का करू नये आम्ही संबंधित मंत्र्यांवर कारवाईची मागणी असे स्पष्ट करत संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

“पालकमंत्र्यांना ‘ते’ अधिकारच नाहीत!” बोरवणकरांच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचे प्रत्युत्तर

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – सीएम शिंदे

दरम्यान, या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली. तसचे अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.

Tags

follow us