Download App

‘चमचे अन् पंक्तीला बसणारे दिल्लीला निघाले’; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार

Sanjay Raut News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत त्यांना दिल्लीला कोण बोलावणार? या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. लोकशाहीवादी आणि देशभक्तांना सध्या दिल्लीत बोलावतच नाहीत. जे चमचे असतात चाटूकार असतात, मोदींच्या भजन मंडळात जे सामील झाले आहेत त्यांनाच बोलावलं जातं. जर राष्ट्रपतींनाच बोलावलं नाही तिथं आमचे काय? असा सवाल करत बाकी न बोलवता जाणारे पंक्तीमध्ये बसणारे अनेक लोक असतात ते चालले असतील, असा टोला राऊत यांनी लगावला.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत संसद भवनाच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादावर ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. प्रधानमंत्री आता तीन देशांच्या दौऱ्यावरून आले आहेत तर आता त्यांनी स्वतः राष्ट्रपती भवनात जावं आणि द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित करावं तसेच या वादावर पडदा टाकावा अशी आमची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.

‘गद्दारांच्या बाजूला बसून त्यांच्या गाड्या चालवता, काय तु्मच्यावर ही वेळ’; राऊतांचा फडणवीसांना टोला

आम्ही विरोधी पक्ष नसून देशभक्त आहोत. या देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटनाला विरोध नाही. पण राष्ट्रपतींनाही सामावून घेतलं पाहिजे. फक्त एक राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ठरवलं असेल तर ते चुकीचं आहे. देशाचं नवीन संसद भवन होतयं आनंद आहे. त्याचं उद्घाटन होतयं याचाही आनंद आहे. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या घटनेवर, संविधानावर हल्ला होतोय याला आमचा विरोध आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कारभारावर घणाघाती टीका केली.

 

Tags

follow us