नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) तांबे विरुद्ध पटोले असा सुरू असलेला वाद आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या (Congress) राजीनाम्यापर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात असे दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचेच काम केल्यानं काँग्रेसमध्ये तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नाराजी पसरली होती. त्यानंतर गटनेते पदाचा राजीनामा देखील बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सुर दिसून येऊ लागला आहे. त्यातच आता बाळासाहेब थोरात यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर आता नाशिकमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. या राजीनामा सत्रामुळे कॉग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.
पेठ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. तालुका अध्यक्ष यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे यांना प्रदेश कॉंग्रेसकडून जी वागणूक मिळाली त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
पेठ तालुकाध्यक्ष विशाल जाधव, महिला अध्यक्ष रूक्मिणी गाडर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे मंजुरीसाठी सादर केले आहेत. यामध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, एनएसयूआय अध्यक्ष ललित मानभाव, सहकार विभागाचे अध्यक्ष कुमार भोंडवे युती अध्यक्ष रेखा भोये, गीता जाधव, विकास सातपुते, राहुल बिरारी, दिनेश भोळे, कैलास गाडर यांचा समावेश आहे.
राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात व सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने आपणास पद वागणूक दिली असून त्यांच्या निषेधार्थ आम्ही पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत आहोत. तालुक्यात केलेली डिजिटल सभासद नोंदणी विसर्जित करत असल्याचे म्हटले आहे. या पदाधिकाऱ्यांने राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्याकडे पाठवण्यात आले असून त्याची एक प्रत प्रदेशअध्यक्ष पटोले यांनाही सादर करण्यात आली आहे.
Balasaheb Thorat चा राजीनामा स्विकारला का?: एच. के. पाटलांनी दिली माहिती
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसवर बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच वर्चस्व राहिले असून, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्याबाबत घडलेल्या घटनांनी स्थानिक काँग्रेसजन व्यथित झाले आहेत. परंतु, थोरात यांचे वैर थेट प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी असल्यामुळे पटोले यांच्याविरोधात जाण्याचे धाडस या पदाधिकाऱ्यांमध्ये नाही. मात्र, पेठ तालुक्यातील पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही त्याची सुरवात असल्याचे मानले जात आहे. हे राजीनामा सत्र सुरू झाल्यास नाना पटोले यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते.