Gopichand Padalkar on Sambhaji Brigade : राज्यामध्ये सध्या ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. काही संघटना जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा थेट आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसंच, पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधत आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड असा जातीयवाद पेटवत असल्याचा हल्ला केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहोचेपर्यंत प्राण सोडला नाही. मात्र, काही लोक मतांसाठी ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत. हे महाराष्ट्रातील बहुजन समाज खपवू घेणार नाही. तसंच, काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून लिहिला. मात्र, त्यामध्ये बहिरजी नाईक, जीवा महाल, शिवा काशिद यांच्याबाबत एक पान देखील लिहिलं गेलं नाही अशी खंतही पडळकर यांनी यावेळी बोलून दाखवली.
तुमचा एक ब्राम्हण नगरसेवक दाखवा, चंद्रकांत पाटलांचे विरोधकांना आव्हान
बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास देखील चुकीचा आहे, हे बोलायला कमी करत नाहीत असंही पडळकर यावेळी म्हणालेत. संभाजी ब्रिगेड मधील लोकांना माझा सवाल आहे की, तुमच्या आई-बापाचं लग्न ब्राह्मणांनी लावलं, मग त्यांनी बायको सोडायची का? तुमचं लग्न देखील ब्राह्मणांनी लावलं मग तुम्ही बायको सोडणार आहात का? तुमच्या घरभरणीची वास्तुशांती ब्राह्मणांनी केली मग तुम्ही घर पाडणार का?, असा सवाल पडळकर यांनी केला.
सगळ्याच समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात. मराठा समाजात देखील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. त्या पद्धतीची प्रवृत्ती त्या समाजात देखील होती. परंतु, इतर मराठा समाजातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ताकतीने लढत होते. म्हणून ती संपूर्ण जात चुकीची नसते. एखादा ब्राह्मण चुकीचा असू शकतो म्हणून सगळ्यांना शिव्या देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला.