Devendra Fadnavis : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. केंद्र सरकार आणखी दहा लाख घरांना मंजुरी देणार आहे. त्यामुळे राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ग्रामविकास विभागातर्फे पुण्यातील यशदा येथे पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फडणवीसांनी माहिती दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेत मंजुरी मिळालेल्या घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा देण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात सर्व कार्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. राज्यातील साडेबारा हजार कार्यालयांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले आहे. आता कामकाजात पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
CM फडणवीसांचा इशारा, शिंदेंचा गायकवाडांना फोन; नाराजी व्यक्त करत सुनावले खडेबोल..
राज्यात साडेतेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली आहे. घरांच्या बांधकामासाठी निधीची तजवीज करण्यात आली आहे. यातील दहा लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. यातील 46 हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभागाने तीस लाख घरे बांधकामाचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता राहणार आहे. घरांसाठी जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम तयार करण्याची योजना राबवण्याचा प्रयत्न आहे. या योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध होतील. चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.