एका धुरंधराचा गौरव करण्यासाठी दुसरे धुरंधर उपस्थित’; फडणवीसांचा शाह-डोवाल यांचा खास उल्लेख
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
“एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर उपस्थित आहेत,” या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गौरव केला. पुण्यात झालेल्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यात बोलताना त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेतील डोवाल यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना “राष्ट्रीय सुरक्षेचे चाणक्य”, तर अमित शाह यांना “राजकारणातील चाणक्य” अशी उपमा दिली. त्यामुळे या सोहळ्याला “दुग्धशर्करा योग” लाभल्याचेही फडणवीस म्हणाले.
यानंतर फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर भारताच्या सुरक्षा धोरणात मोठा बदल झाला. राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती आणि कूटनीती अधिक आक्रमक व प्रभावी करण्यामध्ये डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. “भारत आता केवळ हल्ले सहन करणारा देश राहिलेला नाही, तर गरज पडल्यास शत्रूच्या घरात घुसून प्रत्युत्तर देणारा देश बनला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी डोवाल यांचे प्रसिद्ध वाक्यही उद्धृत केले. “राष्ट्रीय सुरक्षेत रौप्यपदक नसते. जिंकलात तर इतिहास घडवता, हरलात तर इतिहास बनता,” या विचारातून त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट होते, असे ते म्हणाले. देशासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आणि पुरस्काराचा कधीही विचार न करणाऱ्या व्यक्तीला हा सन्मान मिळणे ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://x.com/Dev_Fadnavis/status/2083455575363662084